संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी पाऊल उचला
जि.पं.सीईओ राहुल शिंदे : कित्तूर ता.पं.ला भेट
बेळगाव : पावसाळा सुरू होणार असल्याने साथीचे आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे. तेव्हा संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुका तसेच ग्राम पंचायतींनी खबरदारी घ्यावी. कचऱ्याची उचल तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा, अशी सूचना जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी केली आहे. बुधवारी कित्तूर तालुका पंचायतीला भेट देऊन त्यांनी तालुका पंचायत अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. पिण्याच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ कराव्यात, आता शाळांना लवकरच सुरुवात होणार आहे. त्यामुळे शाळांची अर्धवट असलेली कामे पूर्ण करावीत. मनरेगा योजनेंतर्गत विविध विकासकामे राबवून रोजगारदेखील उपलब्ध करावा, असेही त्यांनी सांगितले. ग्राम पंचायतींच्या जागेमध्ये तसेच मालमत्तांमध्ये अतिक्रमण झाले आहे. त्यांचे संरक्षण करणेही महत्त्वाचे आहे. याचबरोबर ग्राम पंचायतींकडे आलेले अर्ज निकालात काढावेत. स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत सुरू असलेली सार्वजनिक शौचालये तसेच इतर कामे तातडीने पूर्ण करावीत. एकूणच पावसाळ्यापूर्वी ही सर्व कामे पूर्ण करा. विशेषकरून आरोग्याच्या समस्या उद्भवू नयेत, याकडे जातीने लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी तालुका पंचायतचे कार्यकारी अधिकारी भीमाप्पा तळवार, साहाय्यक संचालक सुरेश नागोजी, साहाय्यक निर्देशक लिंगराज हलकर्णीमठ यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.