स्वामी विवेकानंद हे आजही युवा पिढीचे मार्गदर्शक
राष्ट्रीय युवा दिनाच्या कार्यक्रमाच्यावेळी आमदार दिगंबर कामत
मडगाव : त्यावेळीही स्वामी विवेकानंद हे युवा पिढीचे एक मार्गदर्शक होते हे जगाने मान्य केले होते आणि आजही आहेत असे विचार मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी मांडले. मडगावच्या रवींद्र भवनात आयोजीत कार्यक्रमात श्री. कामत बोलत होते. यावेळी व्यासपिठावर आमदार दिगंबर कामत यांच्या व्यतिरिक्त नावेलीचे आमदार तथा कदंब महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर, फातोर्डाचे माजी आमदार तथा रवींद्र भवन मडगावचे माजी अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस दामोदर उर्फ दामु नाईक, रवींद्र भवनचे उपाध्यक्ष मनोहर बोरकर, आग्नेलो फर्नाडिस व अन्य मान्यवर उपस्थित होते.
जगात सर्वात ज्यादा युवा भारतात आहेत आणि ज्या देशात अशा प्रकारची युवा पिढी असेल त्या देशाचा उत्कर्ष कोणीही अडवू शकत नाही. मात्र त्यासाठी या युवा पिढीने योग्य मार्गाचा अवलंब करावा आणि जोपर्यंत युवक चांगल्या मार्गाने जात नाहीत तोपर्यंत देशाचा उत्कर्ष म्हणावा त्याप्रमाणात होईलच असे म्हणता येणार नाही, ते म्हणाले. फातोर्डाचे माजी आमदार दामू नाईक यांनी यावेळी बोलताना जीवनात आदर्श व्यक्ती कोण असावी असे कोणत्याही युवकाला वाटत असेल तर अशा युवकांनी अवश्य स्वामी विवेकानंद यांचे चरित्र वाचावे. चरित्र वाचल्यानंतर असे वाटेल की जीवनात स्वामी विवेकानंद हेच आपले आदर्श असावेत असे सांगितले. महाभारतातील अभिमन्यु, इतिहासातील छत्रपती शिवाजी महाराज, भगत सिंग यांनी आपल्या युवा काळात जे कार्य केले त्यातुनच त्यांनी नंतर आपले नाव अजरामर करुन ठेवलेले आहे. स्वामी विवेकानंद आपल्या अवघ्या 39 वर्षे 5 महिने 23 दिवसाच्या काळात भारताला एका मोठ्या युग पुरुषाची देण देऊन गेले.
fिशकागो येथे आयोजीत करण्यात आलेल्या सर्व धर्म संम्मेलनात वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी या थोर युवकाने ‘माय डिअर ब्रदर्स अॅण्ड सिस्टर्स’ असे शब्द उच्चारले तेव्हा उपस्थितांनी जवळ जवळ दहा मिनिटे उभे राहून टाळ्या वाजवल्या. त्यावेळी ‘माय डिअर ब्रदर्स अॅण्ड सिस्टर्स’ हे वाक्यच नवीन होते आणि हे वाक्य जगाला देणारी पहिली व्यक्ती म्हणजे स्वामी विवकानंद होती. युवा अवस्थेत झालेल्या जडण घडणीतून अशा प्रकारचे प्रगल्भ विचार प्रगट होऊ शकतात असे या थोर पुरुषाचे वर्णन करताना दामु नाईक म्हणाले आणि आज त्यांच्या जयंतीदिनी ज्या मठग्रामात स्वामी विवेकानंद यांचे वास्तव्य होते त्या मडगावच्या स्वामी विवेकानंद केंद्राचा विकास घडवून आणण्यासाठी या कार्यक्रमाच्यावेळी उपस्थित असलेल्या दोन्ही आमदारांनी प्रयत्न करावेत अशी विनंती केली. आमदार उल्हास तुयेकर यांनी आज स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रीय युवक दिवस म्हणुन साजरी करतात हा एक अत्यंत आनंदाचा क्षण असल्याचे नमूद केले आणि युवकांनी या आदर्श युवकाच्या अंगी असलेल्या गुणांचा अवलंब करावा असे आवाहन केले. रवींद्र भवनचे उपाध्यक्ष मनोहर बोरकर यांनी आभार मानले.
पाच युवकांचा सत्कार
यावेळी पाच युवकांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. क्रिकेट खेळाडु सिम्रन आमोणकर, बेसबॉल खेळाडू दुर्गेश प्रभुगावकर, तबला व सोलो ड्रम कलाकार प्रथमेश च्यारी, फाईन आर्ट क्षेत्रातील राजेंद्र म्हार्दोळकर व आकाश नाईक यांचा यावेळी मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.