पाकिस्तानात सुनी-शिया हिंसाचार
वृत्तसंस्था / इस्लामाबाद
पाकिस्तानात गेले सहा दिवस सुनी आणि शिया यांच्यात हिंसाचाराची आग भडकली आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 49 जणांची हत्या करण्यात आली असून 200 हून अधिक जखमी आहेत. एका 30 एकर जमीनीच्या वादावरुन हा हिंसाचार केला जात आहे, अशी माहिती तेथील प्रशासनाकडून देण्यात आली.
पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा या प्रांतातील खुर्रम या जिल्ह्यात या हिंसाचारास बुधवारी प्रारंभ झाला. त्यानंतर त्याचे पडसाद आसपासच्या परिसरात उमटले. या जिल्ह्यातील 30 एक जमीनीवर इस्लाम धर्माच्या या दोन्ही समुदायांनी दावा केला आहे. हा संघर्ष बऱ्याच काळापासून आहे, अशी माहिती देण्यात आली. याच वादातून दोन्ही समुदायांच्या समर्थकांमध्ये जोरदार संघर्ष झाला. तलवारी आणि बंदुका यांचा उपयोग करण्यात आला. दोन्ही समुदायांचे मिळून 49 लोक या हिंसाचारात ठार झाले आहेत. काही अनधिकृत सूत्रांच्या म्हणण्यानुसार मृतांची संख्या सांगितली जाते त्यापेक्षा कितीतरी अधिक आहे. 200 लोक जखमी झाले असून त्यांच्यापैकी काही गंभीर जखमी आहेत. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दंगली रोखण्यात या प्रांताचे प्रशासन अपयशी ठरल्याचे दिसून येते, अशी टीका केली जात आहे. हिंसाचार सलग 6 दिवस आहे.
वाद मिटला होता, पण...
गेल्यावर्षी एका आयोगाची नियुक्ती हा जमीनीचा विवाद मिटविण्यासाठी करण्यात आली होती. आयोगाने दोन्ही गटांमध्ये समझोता घडवून आणला होता. तथापि, गेल्या महिन्यात दोन्ही बाजूंनी एकमेकांवर पुन्हा आरोप-प्रत्यारोप केल्याने हिंसाचार भडकला. दोन्ही बाजूंकडून एकमेकींवर समझोत्याच्या अटींचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला असून हिंसाचाराची आग अनेक गावांमध्ये पसरली आहे. प्रशासनाने वेळीच कारवाई न केल्याने ही परिस्थिती निर्माण झाली, असा आरोप अनेक स्थानिक नागरीकांनी केला. या प्रांतातील पोलिसांवर निष्क्रीयतेचा आरोप होत असून या परिसरात हिंसाचारामुळे भयाचे वातावरण आहे.