वळिवाच्या पावसाचा सर्वाधिक फायदा ऊस पिकाला
वार्ताहर /किणये
यंदा उष्णतेमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ झाली होती. तसेच कडक उन्हामुळे उसाचे पीक सुकून जात होते. शेतशिवारातील विहिरींच्या पाणीपातळीत घट झाली होती. यामुळे ऊस पिकाला पाणी द्यायचे कसे, असा प्रश्न बळीराजासमोर उभा राहिला होता. मात्र गेल्या पाच-सहा दिवसापासून सुरू असलेल्या वळिवाच्या पावसामुळे ऊस पीक बहरून आले. या वळिवाचा सर्वाधिक फायदा ऊस पिकाला झाला आहे. गेल्या काही वर्षाच्या तुलनेत अलीकडे तालुक्यात उसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येऊ लागले आहे. शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणारे झाले आहे. यावर्षीच्या गळीत हंगामात उसाच्या प्रति टनाला 2900 ते 3000 रुपये असा हप्ता जमा करण्यात आलेला आहे. या रकमेत काही साखर कारखान्यांमध्ये बदल आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या शेतशिवारांमध्ये उसाची लागवड केली आहे. कडक उन्हामुळे शिवारातील विहिरी व कूपनलिकांच्या पाणीपातळीत घट झाली होती. बहुतांशी शेतातील ऊस पीक वाळून जाऊ लागले होते. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त बनला होता. अखेर जोरदार वळिवाचा पाऊस झाला आणि शिवारात बऱ्यापैकी ओलावा निर्माण झाला आहे. यामुळे ऊस पिकाला पाणी देण्याची सध्यातरी शेतकऱ्यांची चिंता कमी झाली आहे. तसेच पावसामुळे ऊस पीक बहरले आहे.