Kolhapur News : साखर कारखाने-एफआरपी वाद चिघळला; शेतकरी संघटना मैदानात
साखर कारखान्यांनी एफआरपी न दिल्याने शेतकरी आक्रमक
कोल्हापूर : जिल्ह्यातील काही सहकारी साखर कारखाना यांनी अद्याप एफआरपी दिली नाही. यासह अन्य मागण्याबाबत बैठक आयोजित केली होती. मात्र अद्याप अनेक मागण्या पूर्ण करण्यासाठी कोल्हापूर प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. यासाठी विविध शेतकरी संघटनांच्या बतीने येत्या १५ डिसेंबरपासून आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
मागील हंगामात अनेक साखर कारखान्यांनी एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना अदा केलेली नाही, या थकीत रकमेवर आर. आर. सी. कारवाई करण्याचे बैठकीत मान्य करण्यात आले होते. सुप्रीम कोर्टाच्यामार्गदर्शक सूचनांनुसार अंतिम युक्तिवाद झाल्यानंतर १५ दिवसांत आदेश देणे आवश्यक असताना, अंतिम युक्तिवाद संपून एक महिना होऊनही कारवाई झालेली नाही, असा दावा संघटनांनी निवेदनात केला आहे.
बैठकीतील इतर मागण्यांवरही कोणतीही कारवाई न झाल्याचा आरोप करत, संघटनांनी पूर्वसूचना न देता प्रादेशिक सहसंचालक कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. संघटनांच्या वतीने करण्यात आलेल्या निवेदनावर जय शिवराय किसान संघटनेचे शिवाजी माने, वैभव कांबळे, स्वाभिमानी संभाजी बिग्रेडचे रुपेश पाटील, अभिजीत कांजर, साताप्पा पोवार, ज्ञानदेव पाटील यांसह इतर पदाधिकाऱ्यांनी सह्या केल्या आहेत.
अन्यथा संचालकांच्या विरोधात याचिका
१५ डिसेंबर २०२५ पर्यंत थकीत एफ.आर.पी. आणि त्यावरील व्याज संचालक मंडळाच्या तसेच कार्यकारी संचालकांच्या वैयक्तिक संपत्तीतून वसूल करून शेतकयांच्या खात्यावर जमा करावे. असे न केल्यास, संबंधित अधिकाऱ्यांविरोधात सुप्रीम कोर्टाचा अवमान केल्याबद्दल याचिका दाखल करण्यात येईल.
-- शिवाजी माने, जय शिवराय किसान संघटना