रंग खेळताना दहावीच्या विद्यार्थ्यांना त्रास नको
जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचे आवाहन
बेळगाव : सोमवारपासून एसएसएलसी परीक्षेला सुरुवात होत आहे. मात्र याच दिवशी शहर परिसरात रंगपंचमी साजरी करण्यात येणार आहे. रंग खेळणाऱ्यांनी एसएसएलसी परीक्षार्थी विद्यार्थ्यांना रंग लावू नये व त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नये, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे पालक परीक्षा केंद्रापर्यंत घेऊन जात असतील तर त्यांच्यावरही रंग फेकू नये, तसेच विद्यार्थी ज्या वाहनातून प्रवास करत असतील त्या वाहनचालकावरही रंग न फेकता त्यांना सुसूत्रपणे परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचण्यास सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
पाण्याचा अपव्यय टाळा
सध्या पाणीटंचाई जाणवू लागली आहे. याचा विचार करून रंग खेळताना शक्यतो पाण्याचा अपव्यय होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे, असेही नमूद केले.