For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बांदा ग्रामसभेत शक्तिपीठला तीव्र विरोध

03:17 PM May 03, 2025 IST | अनुजा कुडतरकर
बांदा ग्रामसभेत शक्तिपीठला तीव्र विरोध
Advertisement

महामार्गा विरोधात लढण्यासाठी महामार्ग विरोधी कृती समितीचीही स्थापना

Advertisement

प्रतिनिधी
बांदा

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट असलेल्या प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला येथे आयोजित बांद्याच्या विशेष ग्रामसभेत एकमुखी विरोधाचा ठराव घेण्यात आला. स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी शक्तीपीठ मार्गाला दिलेल्या समर्थनामुळे आयोजित ग्रामसभेत नाराजी व्यक्त करण्यात आली. प्रसंगी माजी मंत्री केसरकर यांच्या विरोधात भुमिका घेऊ असा इशारा यावेळी उपस्थितानी दिला. बांदा बाजारपेठ ही विस्थापित होणार असून बाधित शेतकरी हे भूमिहीन व अल्पभूधारक होणार असल्याने या महामार्गाला सभेत तीव्र विरोध करण्यात आला. महामार्गाच्या विरोधात प्रशासनाशी लढण्यासाठी महामार्ग विरोधी कृती समितीची स्थापना यावेळी करण्यात आली.या समितीच्या अध्यक्षपदी सरपंच प्रियांका नाईक यांची निवड करण्यात आली असून समितीच्या माध्यमातून लढा तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सह्यांची मोहीम राबवून स्थानिकांचा या महामार्गाला विरोध असल्याबाबत निवेदन देण्याचा ठराव घेण्यात आला. स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी शक्तिपीठ महामार्गाला समर्थन दिल्याने त्याचे पडसाद या विशेष ग्रामसभेत उमटले.उपसरपंच राजाराम उर्फ आबा धारगळकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा संपन्न झाली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य राजाराम उर्फ बाळु सावंत, जावेद खतीब, प्रशांत बांदेकर, शामसुंदर मांजरेकर, साई काणेकर, रत्नाकर आगलावे, अनुजा वराडकर, दीपलक्ष्मी सावंत, शिल्पा परब, देवल येडवे, रिया येडवे, ग्रामविस्तार अधिकारी सौ. लीला मोर्ये, तलाठी फिरोज खान, वनपाल प्रमोद सावंत आदी उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला उपसरपंच धारगळकर यांनी शक्तिपीठ महामार्गसाठी शहरातून जाणाऱ्या सर्व्हे नंबरचे वाचन केले. शहरातील एकूण ५८ सर्वे नंबर असल्याची माहिती त्यांनी दिली. शक्तिपीठ महामार्गमुळे बांदा बाजारपेठे पूर्णपणे विस्थापित होण्याचा मुद्दा गुरुनाथ सावंत यांनी उपस्थित केला. हा महामार्ग शहरातून न नेता पर्यायी मार्गाने स्थानिकांना विश्वासात घेऊन न्यावा. या महामार्गला आमचा विरोध नसून स्थानिक शेतकरी यामुळे विस्थापित होणार असतील तर आमचा तीव्र विरोध राहील.महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने गुगल मॅपिंग करून त्याचे सर्वे नंबर आपल्या संकेतस्थळावर टाकले आहेत. त्यानुसार पानवळ येथील गोगटे-वाळके महाविद्यालयाकडून या महामार्गची सुरुवात होणार आहे. बळवंतनगर येथून हॉटेल कावेरी समोर सीमा तपासणी नाक्याकडे हा महामार्ग येणार आहे. याठिकाणी सीमा तपासणी नाक्यासाठी ३२ एकर जमीन संपादित करण्यात आली आहे. तसेच तिलारी उपकालवा व मुंबई गोवा चौपदरी महामार्ग यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी यापूर्वी संपादित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शक्तिपीठसाठी पुन्हा जमिनी संपादित केल्यास स्थानिक शेतकरी हे पूर्णपणे विस्थापित होणार आहेत. तर काही शेतकरी हे भूमिहीन व अल्पभूधारक होणार आहेत. त्यामुळे या महामार्गला आमचा तीव्र विरोध असल्याचा सूर सर्वांनीच आळवला.बाधित शेतकरी अरुण मोर्ये म्हणाले, याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने आपली भूमिका जाहीर करावी, आपल्यासोबत आम्ही सर्व ग्रामस्थ आहोत. याबाबत कृती समिती तयार करून त्याचे नेतृत्व सरपंच व ग्रामपंचायत लोकप्रतिनिधिनी करावे असा निर्णय घेण्यात आला. यावेळी कृती संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी सरपंच प्रियांका नाईक यांची निवड करण्यात आली. या समितीत उपसरपंच आबा धारगळकर, सर्व १५ ग्रामपंचायत सदस्य व बाधित शेतकरी प्रमोद कामत, राजेश विरनोडकर, अरुण मोर्ये, अभय देसाई, प्रसाद गायतोंडे, आनंद गवस, ज्ञानेश्वर सावंत, गुरुनाथ सावंत, शामू धुरी, रामचंद्र वाळके, गजानन गायतोंडे, आनंद सावंत, रवी गवस, अवी पंडित, आपा चिंदरकर, राजेंद्र महाजन, विजय बांदेकर, राजू हडफडकर, प्रशांत सुटणकर, महेंद्र परब, भरत दळवी, नागेश सावंत यांची सर्वानुनाते निवड करण्यात आली.स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी शक्तिपीठ महामार्गाला समर्थन दिल्याने हा मुद्दा गजानन गायतोंडे यांनी ग्रामसभेत उपस्थित केला. यावेळी भाजप व शिवसेना शिंदे गट यांच्यात वादाची ठिणगी पडली. यावेळी भाऊ वाळके, ज्ञानेश्वर सावंत, गुरुनाथ सावंत यांनी प्रसंगी आम्ही शक्तिपीठच्या विरोधात गावासोबत ठामपणे उभे राहू. आमदार केसरकर यांचे ते वयक्तिक मत असून आमची भूमिका ही पूर्णपणे गावातील बाधित शेतकऱ्यांसोबत राहील.

Advertisement

Advertisement
Tags :

.