हद्दवाढीचा एकतर्फी निर्णय झाल्यास तीव्र आंदोलन
आमदार चंद्रदीप नरके यांचा इशारा
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना निवेदन
हद्दवाढीला सर्वपक्षीय समितीचा विरोध कायम
कोल्हापूर
कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा निर्णय ग्रामीण भागातील जनतेला विश्वासात न घेता घेण्यात येऊ नये. हद्दवाढीमध्ये समाविष्ट गावांचा आजही हद्दवाढीला विरोध आहे. त्यामुळे हद्दवाढीबाबत एकतर्फी निर्णय झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा आमदार चंद्रदीप नरके यांनी दिला. यावेळी आमदार अमल महाडिक उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपुर्वी सर्वपक्षीय कोल्हापूर महापालिका हद्दवाढ विरोधी समितीच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री प्रकाश आबिटकर, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांची भेट घेतली. यावेळी नरके, महाडिक यांच्या उपस्थितीत मागणीचे निवेदन दिले.
आमदार नरके म्हणाले, उपनगरांमध्ये अद्यापही मुलभूत सुविधा पुरविण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. येथील सुविधांची वाणवा पाहता ग्रामीण भागातील जनतेची हद्दवाढीमध्ये येण्याची मानसिकता नाही. त्यामुळे हद्दवाढीचा एकतर्फी निर्णय घेण्यात येऊ नये, अशी मागणी आमदार चंद्रदीप नरके यांनी केली.
हद्दवाढ विरोधी समितीच्या शिष्टमंडळाने विकास प्राधिकरणमध्ये समाविष्ट 42 गावांच्या सर्वांगीण विकासासाठी प्राधिकरण सक्षम करणे गरजेचे आहे. यासाठी प्राधिकरणला 1 हजार कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी केली. यावेळी खासदार धैर्यशील माने, हद्दवाढ कृती समितीचे अध्यक्ष उचगावचे लोकनियुक्त सरपंच मुधकर चव्हाण, ज्योतीराम घोडके, संदीप, सचिन चौगले वडणगे, राखी भवड बालिंगे, सुमन गुरव कळंबा, प्रियांका पाटील पाचगांव, अनिता खोत वाडीपीर, अमृता पोवार नागदेववाडी, सुनंदा पाटील आंबेवाडी, संदीप पाटोळे गांधीनगर, शुभांगी अडसुळ सरनोबतवाडी, अश्विनी शिरगावे गडमुडशिंगी, रुपाली कुसाळे वळीवडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
सर्वांना विश्वासात घेऊन योग्य तो निर्णय घेऊ
शहरातील सर्वपक्षीय हद्दवाढ समिती हद्दवाढीसाठी आग्रही आहे. हद्दवाढ होणे गरजेचे आहे. पण सर्वांच्या विचाराने याबाबत निर्णय होणे आवश्यक आहे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, जनता यांची बैठक घेऊन हद्दवाढीबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे पालकमंत्री आबिटकर यांनी सांगितले.