परीक्षा केंद्रांवर पोलिसांचा कडक बंदोबस्त
शुक्रवारपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात : कॉपी रोखण्यासाठी शिक्षण विभागाची मोहीम : बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांना अधिकाऱ्यांच्या भेटी
बेळगाव : दहावी परीक्षेदरम्यान कुठेही कॉपीचे प्रकार घडू नयेत, यासाठी सार्वजनिक शिक्षण विभागाने उपाययोजना केल्या आहेत. ज्या परीक्षा केंद्रांना कंपाउंड नाही अशा केंद्रांवर पोलिसांची हायसिक्युरिटी ठेवली जाणार आहे. तसेच प्रत्येक विद्यार्थ्यावर सीसीटीव्हीची नजर राहील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. मागील दोन दिवसात बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांना अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या असून तेथील यंत्रणेची माहिती घेतली आहे. शुक्रवार दि. 21 पासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 97 केंद्रांवर परीक्षा होणार आहे. बेळगाव शहरात 19 केंद्रात परीक्षा होईल. एकूण 34 हजार 863 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षेदरम्यान सुरळीत वीजपुरवठ्यासाठी हेस्कॉमला जिल्हा पंचायतीकडून पत्र पाठविण्यात आले आहे. त्याचबरोबर प्रत्येक परीक्षा केंद्राचे वेबकास्टिंग योग्यरितीने व्हावे, यासाठी 100 एमबीपीएस नेटवर्कची व्यवस्था करण्यात आली आहे.
हिरेबागेवाडी येथील परीक्षा केंद्र बदलले
दोन वर्षांपूर्वी बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडी गावामध्ये सामूहिक कॉपीचा प्रकार झाला होता. त्यावेळी काही पर्यवेक्षकांवर कारवाई करण्यात आली होती. असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी यावर्षी शिक्षण विभागाने याठिकाणचे परीक्षा केंद्र रद्द केले आहे. गावातील सरकारी शाळेमध्ये यावर्षीची परीक्षा घेतली जाणार आहे. मागीलवर्षी काही सरकारी शाळांमध्ये सीसीटीव्ही नव्हते. परंतु यावर्षी प्रत्येक परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत.
बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याचा आढावा
विभाग विद्यार्थी संख्या परीक्षा केंद्र
बेळगाव शहर............9114..................19
बेळगाव ग्रामीण........5754..................20
खानापूर....................3843..................11
बैलहोंगल..................4389..................11
सात शाळांमध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त
दहावीची परीक्षा पारदर्शकरित्या पूर्ण व्हावी, यासाठी सीसीटीव्हींची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या परीक्षा केंद्रांवर 600 हून अधिक विद्यार्थी असतील अशा ठिकाणचे वेबकास्टिंग करण्यासाठी दोन लॅपटॉपची सोय करण्यात येणार आहे. याचबरोबर ज्या शाळांना कंपाउंड नाही, अशा सात शाळांमध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवला जाणार आहे.
- लीलावती हिरेमठ, जिल्हाशिक्षणाधिकारी