पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजना
पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांची माहिती; जलक्रीडा नौकांना एनओसी अनिवार्य, अन्यथा कठोर कारवाई
पणजी : गोव्याच्या किनारपट्टीचा आनंद लुटणाऱ्या सर्वांची सुरक्षा महत्त्वाची असून त्यासाठी पर्यटन खाते कटिबद्ध आहे. खात्याने पाण्यात चालणाऱ्या सर्व बोटींसाठी नवीन नोंदणी अनिवार्य केली आहे.सर्व बोटी सुरक्षा मानकांची पूर्तता करतात याची खात्री कऊन जलक्रीडांचे निरीक्षण आणि नियमन वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.या नोंदणीमध्ये तपशीलवार सुरक्षा तपासणी,सागरी नियमांच्या अनुपालनाची पडताळणी आणि क्रू सदस्यांसाठी सुरक्षा कवायतींचा समावेश असेल, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली. मंत्री खंवटे पुढे म्हणाले की,पर्यटन विभागाने कॅप्टन ऑफ पोर्ट्सकडून ना हरकत प्रमाणपत्र मागण्यापूर्वी सर्व जलक्रीडा नौकांना विभागाकडून एनओसी घेणे आवश्यक असलेले निर्देश जारी केले आहेत. कळंगुट बीच आधीच जलक्रीडा उपक्रमामुळे व्यस्त आहे. अतिरिक्त ऑपरेशन्ससाठी जागा नाही. सर्व संघटनांनी त्यांचा डेटा जमा करणे आवश्यक आहे आणि पर्यटन विभागाच्या एनओसीशिवाय काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.
वॉटरस्पोर्टस् ऑपरेटरना नोटीस
पर्यटन विभागाने सर्व वॉटरस्पोर्टस् ऑपरेटरना एक औपचारिक नोटीस बजावली आहे की बोटी चालवण्यासाठी पर्यटन विभागाकडून एनओसी घेणे अनिवार्य आहे. त्याचे पालन न केल्यास कठोर उपाययोजना केल्या जातील. ज्यांच्याकडे पर्यटन आणि कॅप्टन ऑफ पोर्ट्स्ची एनओसी आहे त्यांच्यासाठी,नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ वॉटर स्पोर्टस् (एनआयडब्लूएस) वाहून नेण्याच्या क्षमतेचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी आणि आगामी हंगामापूर्वी नवीन परवानग्या जारी करण्यासाठी ऑडिट करेल, असेही खंवटे यांनी सांगितले.
पर्यटकांच्या सुरक्षेला महत्व
पर्यटन विभागाचे संचालक सुनील अंचिपाका म्हणाले की,आम्ही आमच्या सुंदर किनारपट्टीचा आनंद लुटणाऱ्या प्रत्येकाच्या संरक्षणासाठी निर्णायक कारवाई करत आहोत. सर्व बोटींसाठी अनिवार्य नोंदणीची अंमलबजावणी करणे हे कडक सुरक्षा नियमांची अंमलबजावणी करून, आमच्या किनाऱ्यावरील मनोरंजन उपक्रमांमध्ये भाग घेणाऱ्या सर्वांसाठी सुरक्षेची सर्वोच्च मानके राखण्याचे आमचे ध्येय साध्य होणार आहे. पर्यटक सुरक्षिततेशी तडजोड न करता आमच्या किनारपट्टीचा आनंद घेऊ शकतात, असे वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही समर्पित आहोत.
आदेश पालन न करणाऱ्यांना एक लाखाचा दंड
किनारी भागात चालणाऱ्या सर्व बोटी पर्यटन विभागाकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. हा उपक्रम सुरक्षेची मानके वाढवण्यासाठी आणि भविष्यातील घटना रोखण्यासाठी गरजेचा आहे. पर्यटन विभागाचे लक्ष्य सागरी पर्यटन क्षेत्रातील पर्यवेक्षण आणि जबाबदारी सशक्त करणे आहे. या आदेशाचे पालन न केल्यास 1 लाख ऊपयांपर्यंतचा मोठा दंड आणि गोव्याच्या पाण्यात काम करण्यापासून संभाव्य प्रतिबंध समाविष्ट आहे. हे कडक उपाय सर्व सागरी क्रियाकलाप सर्वोच्च सुरक्षा नियमांचे पालन करतात, पर्यटक आणि रहिवाशांच्या हिताचे रक्षण करतात, याची खात्री करण्यासाठी तयार केलेले आहेत. तसेच गोव्याच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या किनाऱ्यांवर येणाऱ्या सर्व पर्यटकांना सुरक्षितता आणि आनंद देण्यासाठी पर्यटन विभाग वचनबद्ध आहे,असेही अंचिपाका यांनी सांगितले.