कुत्र्यांनी घेतला चिमुरडीचा बळी
बोणबाग, तळे दुर्गाभाट येथील ह्य्दयद्रावक घटना : कुंपणाच्या उघड्या गेटमुळे पोचली रस्त्यावर
फोंडा : बोणबाग, तळे-दुर्गाभाट येथे भटक्या कुत्र्यानी एका चिमुकलीचा बळी घेतल्याची ह्दयद्रावक घटना काल शुक्रवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. अनाबिया शेख (शापूर फोंडा) असे मृत बालिकेचे नाव आहे. आपल्या मामाच्या घरी आलेल्या दीड वर्षाच्या या चिमुकलीवर तब्बल 8 भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढवून चावे घेतल्यामुळे तिचा बळी गेला. चिमुरडीच्या मातेसह सर्वांनीच हंबरडा फोडला असून आजी-आजोबानाही दु:ख अनावर झाले आहे. दुसऱ्या बाजूने भटक्या कुत्र्यांबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. भटक्या कुत्र्यांनी माणसांवर हल्ला करण्याच्या प्रकारांत अलीकडच्या काळात गोव्यात बरीच वाढ झालेली असतानाच आता फोंड्यातही हा दुर्दैवी प्रकार घडल्याने एका बाजूने दु:ख तर दुसऱ्या बाजूने संतापही व्यक्त होत आहे. फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भटक्या कुत्र्यांनी तिच्यावर झडप घालून तिचे घेतल्याने रक्तबंबाळ अवस्थेत तिला फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले असता तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
अन् सापडली कुत्र्यांच्या तावडीत
बोणबाग, तळे-दुर्गाभाट येथे आपल्या मामाच्या घरी रहायला आलेल्या अनाबिया शेख ही सकाळी घरच्याची नजर चुकवून घराच्या कुपणांची गेट ओलांडून बाहेर पडली. काही अंतरावर रस्त्यावर कुणीच नसलेल्या ठिकाणी ती पोचल्यानंतर भटक्या कुत्र्यांच्या घोळक्याच्या तावडीत सापडली. आठ भटक्या कुत्र्यांनी तिच्यावर झडप घातली. तत्पूर्वी कुंपणाच्या गेटच्या बाहेरुन तिला कुत्र्यांनी फरफटत दूरवर नेले आणि नंतर तिचे चावे घेतले. चिमुकलीचा आक्रोश कानी पडल्यानंतर घरातील लोकांनी रस्त्याच्या दिशेने धाव घेतली. तोपर्यंत ती रक्तबंबाळ झाली होती. तातडीने फोंडा उपजिल्हा ईस्पितळात दाखल करण्यात आले असता तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शेख दांपत्याला कित्येक वर्षानंतर हे मूल झाले होते, त्यामुळे कुटुंबीय आनंदीत होते.
प्रत्येकाने मुलांची काळजी घ्यावी
कायद्यानुसार कुत्र्यांना मारता येत नाही. भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करण्याचे काम आमची पालिका करते. मात्र, या परिसरात अनेक भटकी कुत्री आहेत. एकटे मूल बघून कुत्र्यांच्या टोळीने अचानक त्याच्यावर हल्ला केला. ज्या भागात दीड वर्षाच्या मुलीवर हल्ला झाला त्या भागात अशा कुत्र्यांची संख्या जास्त आहे. या संकटात आपण दु:खी कुटुंबाच्या पाठीशी उभा आहे आणि प्रत्येकाने आपल्या मुलांची काळजी घेण्याची विनंती करतो, असे कृषीमंत्री रवी नाईक म्हणाले.
-रवी नाईक