ध्वनीप्रदूषण झाल्यास कार्यक्रम बंद पाडा
सामान जप्त करा, कायदेशीरपणे खटला चालवा : गोवा खंडपीठाचा सरकारी यंत्रणांना सक्त आदेश
पणजी : राज्यात किनारी भागातील वाढत्या ध्वनी प्रदूषणावर आता मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठानेच लक्ष घातले आहे. ओझरान्त, हणजुणे येथे 8 आणि 9 डिसेंबर रोजी आयोजित ‘इंडिया बाईक वीक, टीव्हीएस मोटर सोल’ आणि डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या ‘सनबर्न फेस्टिव्हल’ या कार्यक्रमांना जर अधिकृत परवानगी नसल्यास सदर कार्यक्रम सरळ बंद पाडावे, उपकरणे जप्त करावीत आणि नियमांचे उल्लंघन झाल्यास खटला चालवावा, असा आदेश सरकारी यंत्रणांना न्यायालयाने दिला आहे. गोव्यात मोठ्या प्रमाणात इव्हेन्ट, क्रीडा, संगीत रजनी होतात. या कार्यक्रमांत ध्वनी प्रदूषण होण्याच्या तक्रारी स्थानिकांकडून होत असल्या तरी प्रशासन, पोलीस आणि अन्य सरकारी यंत्रणांकडून हवे तसे नियंत्रण आणि बंदी घातली जात नसल्याचे सर्वसामान्यपणे घडत असल्याचे आढळून आले आहे. एका महत्त्वाच्या घडामोडीत गोवा खंडपीठाने गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलीस आणि उपविभागीय दंडाधिकारी यांना ओझरान्त हणजुणे येथे 8 आणि 9 डिसेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात डेसिबल पातळीचे उल्लंघन होणार नाही याची खात्री करण्यासाठी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. आवाजाची पातळी मर्यादेबाहेर गेल्यास हा कार्यक्रम थांबवावा, उपकरणे जप्त करावीत आणि नियमांचे उल्लंघन झाल्यास खटला चालवावा, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. याबाबत न्यायालयासमोर येत्या 12 डिसेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीवेळी अहवाल सादर करण्याचाही आदेश दिला आहे.
तिन्ही कार्यक्रमांना सरकारी पवनागी नाहीच
गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळने न्यायालयात कबुली दिली की ओझरान्त हणजुणे येथील ‘इंडिया बाईक वीक,टीव्हीएस मोटर सोल’ आणि डिसेंबरच्या 28 तारखेनंतर होणाऱ्या ‘सनबर्न फेस्टिव्हल’ या कार्यक्रमांना आतापर्यंत कोणत्याही परवानग्या जारी करण्यात आलेल्या नाहीत. पर्यटन विभाग आणि सीआरझेड अधिकाऱ्यांची एनओसीही नाही.