For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ZP Election 2025: नरकेंच्या एंट्रीमुळे नवं समीकरण, निवडणूका आरक्षण सोडतीप्रमाणे होणार?

03:54 PM May 12, 2025 IST | Snehal Patil
zp election 2025  नरकेंच्या एंट्रीमुळे नवं समीकरण  निवडणूका आरक्षण सोडतीप्रमाणे होणार
Advertisement

यानिमित्ताने तालुक्यात नवीन राजकीय समीकरणे जुळणार असल्याचे संकेत

Advertisement

By : रामचंद्र कुपले

गगनबावडा : लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका केव्हा होणार याचे वेध राजकीय नेते, कार्यकर्त्यांना लागून राहिले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. या निवडणुका तीन वर्षांपूर्वीच्या आरक्षण सोडतीप्रमाणे की नव्याने सोडतीनुसार होणार, यावर गगनबावडा तालुक्यातील राजकीय घडामोडी ठरणार आहेत. त्यातूनच नवीन राजकीय समीकरणे जुळणार आहेत.

Advertisement

गगनबावडा तालुक्याच्या राजकीय पटलावर राजकीय पक्षांपेक्षा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आमदार सतेज पाटील आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष पी. जी. शिंदे या दोन पारंपरिक गटातच होतात. आमदार चंद्रदीप नरके यांची विधानसभेतील एंट्री येथील नवीन राजकीय समीकरणाची नांदी आहे.

29 ग्रामपंचायती, 44 महसुली गावांचा समावेश गगनबावडा तालुक्यात आहे. 2017 साली झालेल्या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या असळज, तिसंगी या दोन्ही ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली होतीतालुक्यात तिसंगी, असंडोली, असळज, धुंदवडे असे चार पंचायत समितीचे मतदारसंघ आहेत.

धुंदवडे गटात भाजप तर उर्वरित तिन्ही ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसची सत्ता होती. जिल्हा परिषद, पंचायत समिती या दोन्ही ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचे वर्चस्व होते. दीड वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मविआचे उमेदवार शाहू छत्रपती यांनी सुमारे 7800 मताधिक्य घेतले होते. तर गतवेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मविआचे उमेदवार राहुल पाटील यांनी सुमारे 3100 मताधिक्य घेतले होते.

आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने कमी अधिक प्रमाणावर सतत मताधिक्य घेतले आहे. बहुतांशी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकहाती सत्ता स्थापन केली आहे. गतवेळच्या करवीर विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार चंद्रदीप नरके यांनी विजय संपादन केला. या निमित्ताने तालुक्यात नवीन राजकीय समीकरणे जुळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

जिल्हा बँकेचे माजी चेअरमन पी. जी. शिंदे यांचे पुत्र स्वप्नील शिंदे विद्यमान भाजप तालुकाध्यक्ष आहेत. त्यांनी ‘गाव तेथे भाजपा सदस्य’ नोंदणी मोहीम राबवली आहे. शिवसेना आमदार चंद्रदीप नरके यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी निकटचे संबंध आहेत. याचा फायदा उठवत ‘गाव तेथे शिवसेना शाखा व गाव तेथे विकास काम’ हे धोरण हाती घेतले आहे. गेल्या तीन वर्षांपासून प्रशासनाच्या वतीने कामकाज सुरू आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याच्या दृष्टीने जुलै 2022 मध्ये आरक्षण सोडत झाली. गतवेळी जिल्हा परिषदेच्या दोन्ही जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित होत्या. यावेळी या दोन्ही जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित आहेत. तालुक्यातील पंचायत समितीच्या जागाही पुढीलप्रमाणे आरक्षित झाल्या आहेत. तिसंगी- अनुसूचित जाती, असंडोली- सर्वसाधारण, असळज- नागरिकांचा मागास प्रवर्ग, धुंदवडे- सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाला आहे.

या आरक्षण सोडतीनंतर इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. गाठीभेटी, संपर्क वाढविला आहे. आगामी काळात होणाऱ्या निवडणुका या सोडतीप्रमाणे होणार का नव्याने आरक्षण बदलणार यावरच पुढील दिशा ठरणार आहे. सध्या याबाबत तर्कवितर्क लावले जात असले तरी कोण कोणाशी युती करणार, कोणत्या आघाडीत बिघाडी होणार, कोण कोणाचा काटा काढणार, सत्ताधारी की विरोधी आघाडीची सरशी होणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.

Advertisement
Tags :

.