सोनुर्ली एसटी बस वेळेत सोडून गैरसोय दूर करा
भाजपा सरचिटणीस महेश सारंग यांच्यासह शिष्टमंडळाचे आगार व्यवस्थापकांना निवेदन
न्हावेली / वार्ताहर
सावंतवाडी येथील एसटी आगारातून अनियमित सोडण्यात येणारी सव्वानऊ वाजताची सोनुर्ली एसटी बस वेळेत सोडून शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर करा,अशी मागणी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांच्यासह शिष्टमंडळाने आगारातून व्यवस्थापक नीलेश गावीत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. सोनुर्ली गावासाठी सावंतवाडी आगारातून दररोज सकाळी सव्वानऊ वाजता एसटी बस सोडण्यात येते सदरची एसटी बस ही दहा वाजता सोनुर्ली गावामध्ये दाखल होते.सावंतवाडी शहरामध्ये कॉलेज तसेच महाविद्यालयीन शिक्षणासाठी येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना महत्त्वाची आहे. मात्र गेले वर्षभर हे एसटी बस अनियमित गावात पोहोचत असल्याने शालेय विद्यार्थ्यांसह बाजारहाटासाठी सावंतवाडी शहरात जाणाऱ्या ग्रामस्थांना आर्थिक भुर्दंड सहन करुन खासगी वाहनाने शहरात जावे लागते.तर शालेय विद्यार्थ्याना नाईलाजास्तव शाळा कॉलेज चूकवावे लागते.एकूणच एसटी आगाराच्या या काराभाराबाबत वेळोवेळी उपसरपंच भरत गावंकर यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आगार व्यवस्थापक श्री. गावीत यांचे लक्ष वेधले होते. वेळोवेळी केवळ आश्वासन देण्याचे काम त्यांच्याकडून झाले.लक्ष वेधल्यानंतर एक दिवस वेळेवर तर पुढचे काही दिवस अनियमित अशी परिस्थिती या एसटी बसच्या बाबतीत घडत आली आहे.त्यामुळे ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.एकूणच या समस्या संदर्भात भाजपाचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांच्यासह सावंतवाडी शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर ,महेश धुरी ,सचिन बिर्जे ,यांनी आगार व्यवस्थापक श्री.गावीत यांची भेट घेत निवेदन सादर केले.सदरची बस ही गावातील विद्यार्थी तसेच ग्रामस्थांसाठी अत्यंत महत्वाची आहे.या गावातील लोकांना एसटी बससाठी तब्बल पाच किलोमीटर न्हावेली याठिकाणी यावे लागते यामुळे ग्रामस्थांच्या आर्थिक नुकसान होते. सदरची बस ही यापुढे गावात वेळेवर सोडण्यात यावी व ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर व्हावी अशी मागणी यावेळी त्यांनी केली. दरम्यान श्री.गावीत यांनी सदरची बस वेळेत सोडण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया केली जाईल असे आश्वासन दिले.