तुकानहट्टी ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
स्मशानभूमीचा विकास करण्याची मागणी
बेळगाव : मुडलगी तालुक्यातील तुकानहट्टी गावामध्ये तीन स्मशानभूमी असून स्मशानाचा विकास रखडल्याने ग्रामस्थांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. स्मशानभूमीमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नसल्याने गैरसोय होत आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन स्मशानाचा विकास करावा, अशी मागणी ग्रामस्थांतर्फे करण्यात आली. तुकानहट्टी (ता. मुडलगी) विविध समाजाच्या तीन स्मशानभूमी आहेत. मात्र त्याठिकाणी अंत्यक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा नसल्याने अंत्यक्रियेदरम्यान मोठी गैरसोय निर्माण होत आहे. पिण्याचे पाणी, रस्ते, पथदीप या सुविधा नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. तर शेड नसल्यामुळेही पावसामध्ये अंत्यविधीदरम्यान नागरिकांचे हाल होत आहेत. सदर स्मशानभूमीमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन तुकानहट्टी ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना देण्यात आले आहे. यावेळी गुरुनाथ हुक्केरी, मंजू गडादी, यल्लाप्पा गडादी, कुमार मरणी, चुनप्पा पुजारी आदी उपस्थित होते.