चारा-पाणी बँकेसाठी रयत मोर्चाचे निवेदन
जिल्हाधिकाऱ्यांकडून तात्काळ दखल
बेळगाव : उन्हाळ्याच्या दिवसात जिल्हा प्रशासनाकडून जनावरांच्या चाऱ्यासाठी चारा व पाणी बँक सुरू केली होती. परंतु वळिवाचा पाऊस होताच चारही बँक बंद करण्यात आल्या. यामुळे शेतकरी अडचणीत असून या चारा बँका पुन्हा सुरू करण्याची मागणी रयत संघटनेच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ याची दखल घेत चारा बँक सुरू करण्याच्या सूचना दिल्या. यावर्षी बेळगाव जिल्ह्यात दुष्काळ पडल्याने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासनाने पाणी व चारा बँक सुरू केली. काही दिवस चिकोडी, निपाणी या परिसरात चार बँका चालविण्यात आल्या. यामुळे जनावरांना दुष्काळातही पाणी व चारा मिळणे शक्य होत होते. परंतु 15 दिवसांपूर्वी झालेल्या वळिवाच्या पावसानंतर प्रशासनाने चारा बँक बंद केल्या. परंतु अद्याप मान्सून दाखल होण्यास विलंब असल्याने तोवर शेतकऱ्यांची अडचण होणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने चारा व पाणी बँक पुन्हा सुरू करण्याची मागणी रयत मोर्चाने निवेदनाद्वारे केली. एम. के. हुबळी येथील सरकारी रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता असल्याने त्याठिकाणी डॉक्टर उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी निवेदन स्वीकारून आपण याबाबत योग्य निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले. यावेळी रयत संघाचे चुन्नाप्पा पुजारी, राजू पोवार, वासू पंड्रोळी, आनंद पाच्छापुरे, इराण्णा पाटील यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.