जंगलातील पशु - पक्षी हे आपले शत्रू नसून पर्यावरणाचे संवर्धक !
माजगाव वन परिमंडळाचे वनपाल प्रमोद राणे यांचे प्रतिपादन
ओटवणे | प्रतिनिधी
वन्य जीवाचे महत्त्व मानवासाठी खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे वन्य पशु पक्षी हे आपले शत्रू नसून पर्यावरणाचे संवर्धन करण्याचे ते एक साधन आहे. या वन्य जीवामध्ये पशु पक्षी यांचे जतन, संवर्धन केले तर पर्यावरणाचा समतोल राखण्याचे मोठे कार्य आपल्या हातून घडणार आहे. असे प्रतिपादन माजगाव वन परिमंडळाचे वनपाल प्रमोद राणे यांनी केले.वन्य जीव सप्ताह उपक्रमांतर्गत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय चराठे शाळा नं १ येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमोद राणे बोलत होते. यावेळी माजगाव वनरक्षक सुशांत चोथे, ओटवणे वनरक्षक कोमल बांगर, शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री पेडणेकर, अमिषा कुंभार, आदिती चव्हाण, धनदा शिंदे आदी उपस्थित होत्या.सावंतवाडी वनविभागाचे उपवनसंरक्षक मिलिश शर्मा, सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे, वनक्षेत्रपाल सुहास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ माजगाव यांच्यातर्फे शालेय विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीव, जंगल सुरक्षा, पर्यावरण संरक्षण याबाबत जाणिव जागृती व्हावी या उद्देशाने या मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुशांत चोथे यांनी मुलांना वन्यजीवांचे निसर्गातील व मानवी जीवनातील महत्त्व सांगुन झाडे लावा झाडे जगवा हा वृक्षसंवर्धनाचा मोलाचा संदेश दिला. तर कोमल बांगर यांनी वनाविषयी व प्राण्याविषयी प्रेम निर्माण व्हावे यासाठी शासनाच्यावतीने १ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत दरवर्षी वन्यजीव सप्ताह साजरा केला जात असल्याचे सांगून या वन्य जीव सप्ताहाची सुरुवात १९५२ सालापासून भारत देशामध्ये सुरुवात झाल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका जयश्री पेडणेकर यांनी, सुत्रसंचालन अमिषा कुंभार यांनी तर आभार धनदा शिंदे यांनी मानले.