राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट
एकंबे :
हर्षल पाटील या उमद्या तरुण ठेकेदाराने आत्महत्या करून एक आठवडा उलटला आहे. राज्य सरकारने साधी कोणी चौकशी केली नाही का कोणी तिथे आले नाही. कुटुंबाला मदत सोडा, सरकारमधील एकही व्यक्तीने त्याच्या कुटुंबाची विचारपूस केली नाही. उलट हर्षल पाटील हा सरकारचा ठेकेदार नव्हता, असे सांगत हात झटकून टाकण्याचा प्रकार सुरू आहे. सरकारने मूळ ठेकेदारांची बिले अदा केली असती तर हर्षल पाटील याने टोकाचे पाऊल उचलले नसते, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली.
सांगली जिह्यातील वाळवा तालुक्यात तांदुळवाडी गावचा तरुण ठेकेदार स्व. हर्षल पाटील यांच्या निवासस्थानी आमदार शिंदे यांनी सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याचे सुमारास माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्यासमवेत भेट दिली आणि कुटुंबीयांचे सांत्वन केले.
शेतकरी कुटुंबातील या होतकरू तरुणाने सरकारवर विश्वास ठेवला होता. त्याच्या वरच्या ठेकेदारावर विश्वास ठेवला होता. पण सरकारने त्यांची थकीत बिले काढली नाहीत. त्यामुळे तो आर्थिक संकटात आला आणि शेवटी त्याने नाईलाजाने आत्महत्या केली. त्याच्यासारखी वेळ अन्य कोणावर येऊ नये, यासाठी राज्य सरकारने पुढे येऊन उपाययोजना करणे आवश्यक होते. मात्र सरकार राजकारणात व्यस्त असून त्यांना पाटील कुटुंबीयांची साधी भेट घेणे जमले नाही किंवा जमत नाही, याहून मोठे दुर्दैव नाही, अशी टीकादेखील आमदार शिंदे यांनी केल़ी.
सरकारने राज्यभरातील पाच लाख ठेकेदारांची 89 हजार कोटी रुपयांची बिले थांबवली आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने खोटी आश्वासने दिली, कामांची उद्घाटने केली. आता सरकारकडे द्यायला पैसे नाहीत. याचा परिणाम राज्यातील प्रत्येक घटकांवर होत आहे. मी वारंवार कंत्राटदारांना सांगायचो की, या सरकारवर भरोसा ठेवून कामे घेऊ नका. सरकार जेवढे पैसे देईल तेवढेच काम करा. या सरकारवर आगाऊ विश्वास ठेवून कामे करू नका. आज काय परिस्थिती आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबत नाही तसे ठेकेदारांच्या बाबतीत घडू नये, अशी भीती देखील आमदार शिंदे यांनी व्यक्त केली.