स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीला लागा!
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे मार्गदर्शन, 60 हजार विद्यार्थ्यांशी साधला आभासी संवाद
प्रतिनिधी/ पणजी
करिअरच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षा हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. त्यासाठी दहावी नंतर काय? या संभ्रमात न पडता विद्यार्थ्यांनी लगेच स्पर्धात्मक परीक्षांची तयारी सुरू करावी. अन्य राज्यांप्रमाणे गोव्यातही स्पर्धात्मक परीक्षांसाठी आवश्यक अशी संस्कृती तयार झाली पाहिजे. त्यासंबंधी विद्यार्थ्यांनी काही शंका असल्यास आपल्या शिक्षकांना विचाराव्यात, तसेच शिक्षकांनीही विद्यार्थ्यांचा कल ओळखून त्यांना मार्गदर्शन करावे. खास करून ग्रामीण भागातील शिक्षकांनी यात विशेष रस घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
शनिवारी राज्यभरातील 8 वी ते 10 वी इयत्तेच्या सुमारे 60 हजार विद्यार्थ्यांशी आभासी पद्धतीने संवाद साधताना ते बोलत होते. वेळगे येथील श्रीमती हायस्कूल येथून आयोजित या करिअर मार्गदर्शन कार्यक्रमास त्यांच्यासोबत डॉ. महादेव गावस आणि पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांची उपस्थिती होती. त्यावेळी श्री. गावस यांनी करिअरसंबंधी तर श्री. गुप्ता यांनी सायबर गुह्यांची माहिती देऊन मार्गदर्शन केले.
आयटीआयमध्ये 15 पासून ’आदरातिथ्य’, ’हाऊसकिपिंग’ अभ्यासक्रम :मुख्यमंत्री
पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी, राज्यात दरवर्षी दहावीचा निकाल 90 ते 92 टक्क्यांपर्यंत लागतो हे सत्य असले तरी विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही विशेष प्रयत्न केल्यास हा निकाल 100 टक्के लागू शकतो, असा विश्वास व्यक्त केला. पूर्वापार चालत आलेली ‘12 वी नंतर महाविद्यालयीन शिक्षण’ ही संकल्पना आता बदलली आहे. कारण आता प्रत्येक विद्यार्थ्याला कौशल्य विकासाची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. राज्यातील एकूण आयटीआयमधून सुमारे 14 ते 15 प्रकारचे अभ्यासक्रम शिकविण्यात येतात. त्यात आता ’आदरातिथ्य’ आणि ’हाऊसकिपिंग’ या दोन अभ्यासक्रमांची भर पडणार आहे. येत्या 15 जुलैपासून हे अभ्यासक्रम सुरू होत असून विविध कौशल्य विकासासाठी त्यांचाही विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. आतापर्यंत अनेक विद्यार्थी आयटीआय करून यशस्वी उद्योजक बनले आहेत. त्यामुळे आयटीआयला कुणी निम्न दर्जाचे शिक्षण समजू नये, असे ते पुढे म्हणाले.
अनोळखी व्यक्तीची ’फ्रेंड रिक्वेस्ट’ नकोच : गुप्ता
श्री. गुप्ता यांनी मार्गदर्शन करताना, विद्यार्थ्यांनी गरज असेल तेव्हाच स्मार्ट फोन वापरावा व सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीशी मैत्री करताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन केले. अनोळखी व्यक्तीच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नयेत. गेमिंग, सोशल मीडिया किंवा अन्य ऑनलाईन माध्यमातून आपली सायबर फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी. स्पर्धात्मक परीक्षा द्यायच्या असतील तर मोबाईलचा कमीत कमी वापर करावा लागेल, असेही त्यांनी पुढे सांगितले.