जांबोटी-खानापूर मार्गावर जादा बसेस सोडा
शिक्षक-शालेय विद्यार्थ्यांच्यावतीने खानापूर आगारप्रमुखांना निवेदन
वार्ताहर /जांबोटी
जांबोटी-खानापूर मार्गावर सकाळी व सायंकाळच्या वेळेत शालेय विद्यार्थ्यांसाठी, जादा बससेवा सुरू करावी, अशा मागणीचे निवेदन ओलमणी येथील शिक्षक वर्ग व शालेय विद्यार्थ्यांच्यावतीने खानापूर आगारप्रमुखांना गुरुवारी देण्यात आले. जाबोटी-खानापूर मार्गावर अपुरी व अवेळी बससेवा असल्यामुळे ओलमणी व जांबोटी परिसरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. ओलमणी येथे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणासाठी दारोळी, मोदेकोप, ओत्तोळी, नागुर्डा आदी गावातील सुमारे 30 ते 40 विद्यार्थी नियमित ये-जा करतात.
वास्तविक या भागात जांबोटीपासून पुढील विविध गावांसाठी खानापूर आगारामार्फत अनेक बससेवा सुरू आहेत. मात्र त्या सर्व बसफेऱ्या खानापूरहून सकाळी 7.30 ते 8 या वेळेत सुटत असल्यामुळे खानापूर-जांबोटी मार्गावरील ओलमणी व जांबोटी येथे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थी वर्ग तसेच शिक्षक व प्रवासी वर्गासाठी कूचकामी ठरल्या आहेत. सकाळी 8 ते 10 च्या कालावधीपर्यंत खानापूरहून- जांबोटीकडे येणारी एकही बससेवा उपलब्ध नसल्यामुळे दारोळी, ओत्तोळी, मोदेकोप आदी गावातील शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.
विद्यार्थी वर्गांना बसची वाट पाहत तासन्तास थांबावे लागत असल्याने, विद्यार्थी वर्गांना पहिल्या एक-दोन तासापासून वंचित राहावे लागत असल्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याची दखल घेऊन ओलमणी येथील राजर्षी शाहू हायस्कूल व उच्च प्राथमिक मराठी शाळेचा शिक्षक वर्ग व विद्यार्थ्यांनी गुरुवारी खानापूर आगारप्रमुख महेश तिरकन्नावर यांची भेट घतली. व शालेय विद्यार्थ्यांसाठी सकाळी 9 वाजता खानापूर-जांबोटी व सायंकाळी 4.45 वाजता जांबोटी-खानापूर अशी जादा बससेवा सुरू करावी, अशा मागणीचे निवेदन आगार प्रमुखांना देण्यात आले आहे.
जादा बससेवा सुरू करण्याचे आश्वासन
निवेदनाचा स्वीकार करून खानापूर आगारप्रमुख महेश तिरकन्नावर यांनी शालेय विद्यार्थ्यांची होणारी शैक्षणिक गैरसोय दूर करण्यासाठी जांबोटी-खानापूर मार्गावर सकाळी व सायंकाळी या वेळेस जादा बससेवा सुरू करण्याचे आश्वासन शिक्षक वर्गांना दिले आहे. यावेळी राजर्षी शाहू हायस्कूलचे मुख्याध्यापक सी. एस. कदम, ओलमणी उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पी. आर. गुरव, एस. टी. मेलगे, ए. जे. सावंत व वर्षा चौगुले आदी शिक्षक वर्ग उपस्थित होता.