लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी : 6 जणांचा मृत्यू
60 हून अधिक भाविक जखमी ; गोव्याच्या इतिहासातील प्रथमच दुर्दैवी घटना, शिरगावच्या जत्रोत्सवालाही लागले गालबोट
रविराज च्यारी / डिचोली
संपूर्ण गोवा तसेच महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यांमध्येही प्रसिद्ध असलेल्या व देवीच्या श्रद्धेपोटी लाखोंच्या संख्येने भाविकांची दरवर्षी उपस्थिती लाभत असलेल्या शिरगाव येथील श्री देवी लईराई जत्रोत्सवास यावर्षी गालबोट लागले. शनिवारी पहाटे होमकुंड पेटून धोंडगणांचे अग्निदिव्य मार्गक्रमण सुरू असतानाच धोकादायक तसेच दरवर्षी ‘ब्लॅकस्पॉट’ म्हणून समजल्या जाणाऱ्या उतरणीच्या रस्त्यावर एका रांगेत दाटीवाटीने उभे असलेल्या धोंडगणांमध्ये एकच गोंधळ उडाला व झालेल्या चेंगराचेंगरीत सहा जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची दु:खदायक घटना घडली.
या घटनेमागे नेमके कारण काय याचा शोध जरी घेतला जात असला तरी प्रत्यक्षात शिरगावात भेट दिल्यानंतर दोन-तीन कारणे समोर आली आहेत. त्याचबरोबर दरवर्षी या जत्रोत्सवानंतर ज्या गोष्टीची चर्चा असते ती म्हणजे जत्रोत्सवात धोंडगणांकडून होणारी बेजबाबदार कृती. आज झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर या मुद्द्यावरही प्रकर्षाने बोट ठेवण्यात येत आहे. या घटनेमुळे शिरगाव, डिचोली तालुक्यासह संपूर्ण गोवा हादरला असून सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.
उपलब्ध माहितीनुसार पहाटे 3.15 वाजण्याच्या सुमारास सदर चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली. पवित्र तळीवर स्नान करून मु•ाr येथे देवीचा कौल प्रसाद म्हणजेच मोगरीचा कळा तोंडात धरून धोंडगणांनी अग्निदिव्य मार्गक्रमणास सुऊवात केली होती. या जत्रोत्सवात सहभागी होणाऱ्या प्रत्येक धोंडगणाला अग्निदिव्य मार्गक्रमण करण्याची मोठी आतुरता असते, त्याच आतुरतेने सर्व धोंडगण दाटीवाटीने आरबीएल बँक समोरील उतरणीच्या रस्त्यावर एका बाजूने रांगेत उभे होते. त्याचवेळी अचानक गोंधळ उडाला व नेमके उतरणीच्याच ठिकाणी काही धोंडगण या गोंधळातील झालेल्या धक्काबुक्कीत खाली पडले. ते खाली पडताच उतरणीच्या या रस्त्यावर त्यांच्या मागाहून असलेल्या धोंडगणांचाही तोल गेला व तेही खाली पडले व त्यांच्याही मागे असलेल्या धोंडगणांमध्ये जीव वाचवण्यासाठी एकच धुमश्चक्री सुरू झाली. या मोठ्या गोंधळात अनेक जण धोंडगणांच्या पायाखाली दबले गेले व गुदमरले.
तत्काळ काही धोंडगणांनी रस्त्यावर बेशुद्धावस्थेत पडलेल्या इतर धोंडगणांना बाजूला केले. तसेच यावेळी ड्युटीवर तैनात असलेले पोलिसही तत्परतेने घटनास्थळी धावून आले व त्यांनी लागलीच मदत कार्याला सुऊवात केली. रस्त्यावर पडलेल्या धोंडगणांना उचलून बाजूला नेत कोणत्याही ऊग्णवाहिकेची
प्रतीक्षा न करता पोलीस वाहनांमध्ये जखमींना भरून इस्पितळाचा मार्ग धरला. काही जणांना डिचोली तर अनेकांना म्हापसा येथील जिल्हा ऊग्णालयात नेण्यात आले. परंतु या जखमींपैकी सहा जणांना इस्पितळात दाखल करताच तेथील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
डिचोली येथील सामाजिक आरोग्य केंद्रात तीन मृतदेह तर म्हापसा येथील जिल्हा ऊग्णालयात तीन असे सहा जणांचे मृतदेह दाखल करण्यात आले. या घटनेत मृत झालेल्यांची नावे सूर्या मयेकर (पडोसे-पर्ये सत्तरी), सागर नंदरगे (माठवाडा-पिळगाव), आदित्य कवठणकर व तनुजा कवठणकर (अवचितवाडा थिवी), यशवंत केरकर (माडेल थिवी) व प्रतिभा कळंगुटकर (कुंभारजुवे) अशी आहेत. या सहा मृतांमध्ये दोन महिला तर एक आदित्य कवठाणकर हा 17 वर्षीय मुलगा आहे. पडोसे-सत्तरी येथील सूर्या मयेकर हे 60 वर्षीय वृद्ध होते. तर माठवाडा पिळगाव येथील सागर नंदरगे हा 30 वर्षीय अविवाहित युवक आहे. तर थिवी-माडेल येथील यशवंत केरकर हे 40 वर्षीय गृहस्थ होते.
शिरगाव येथील श्री देवीच्या जत्रोत्सवात दरवर्षी लाखोंच्या संख्येने धोंडगण व भाविकांची गर्दी होतच असते, या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दरवर्षी पोलीस कुमक ही कमीच पडत असते. तरीही यावर्षी पोलीस फौजफाटा मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आला होता. तसेच यावर्षी ड्रोनद्वारे पोलीस गस्त घालण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. असे असतानाही नेमके याच वर्षी मोठ्या प्रमाणात गोंधळ उडून चेंगराचेंगरी व्हावी व सहा जणांचे त्यात मृत्यू व्हावे, ही अत्यंत दुर्दैवी अशीच घटना आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. तर दुसऱ्या बाजूने पोलीस व प्रशासनाने आपली कामगिरी चोख व व्यवस्थितरित्या बजावली, परंतु धोंडगणांच्या दरवर्षीप्रमाणे झालेल्या बेजबाबदारपणामुळे ही चेंगराचेंगरीची घटना घडल्याचे बोलले जात आहे.
अरूंद व उतरणीच्या रस्त्यावर उपाययोजना करणार : मुख्यमंत्री
शिरगाव येथील घटना घडलेला हा रस्ता अत्यंत अऊंद व उतरणीचा असल्याने तो धोकादायक आहे. या रस्त्यासंदर्भात काय उपाययोजना करता येईल, यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते, वाहतूक विभाग व इतर संबंधित सरकारी यंत्रणांना कामाला लावून पुढील जत्रोत्सवापूर्वी ही सर्व गैरसोय दूर करण्याचा प्रयत्न केला जईल. अशा प्रकारच्या घटना भविष्यात कधीही घडू नये, यासाठी काम केले जाणार आहे. या कामात देवस्थान समिती तसेच गावातील स्थानिक लोकांनीही सरकारला सहकार्य करणे अपेक्षित असून रस्त्याबाजूची जागा ही गावकऱ्यांची असल्याने त्यांचे सहकार्य आवश्यक आहे, असे यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
पंतप्रधानांनी फोनवरून घेतली माहिती
या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपणास सकाळी स्वत: फोन करून घटनेची माहिती जाणून घेतली व मृत पावलेल्या लोकांविषयी संवेदना व्यक्त केली. तसेच या घटनेनंतर राज्य सरकारला जर कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन सहकार्याची गरज असल्यास केंद्र सरकार तत्पर असल्याचे त्यांनी आश्वासन आपणास दिले आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी सांगितले