महिला कर्मचारी हाताळणार ‘एसएसबी’चे श्वान पथक
वृत्तसंस्था/ लखनौ
सशस्त्र सीमा दलाने (एसएसबी) पहिल्यांदाच श्वान पथक हाताळण्यासाठी तीन महिलांची नियुक्ती केली आहे. कल्पनाबेन मनुभाई (24), आंचल राणी (23) आणि नेहा सोनकर (22) यांनी सहा महिन्यांचे कठोर प्रशिक्षण पूर्ण केले. आता ते बहराइच जिह्यातील नानपारा येथे 42व्या बटालियनमध्ये रुजू झाल्या आहेत. राज्यात प्रथमच कोणत्याही दलाने श्वानपथक हाताळण्याची जबाबदारी पहिल्यांदाच महिलांवर दिल्याचे लखनौ मुख्यालयातील एसएसबी कमांडंट ए. के. सिन्हा यांनी सांगितले. केंद्रीय दलातील स्त्री-पुऊष समानतेच्या दृष्टीने हा निर्णय मैलाचा दगड ठरेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
अमली पदार्थ, स्फोटके आणि रक्ताचे डाग शोधण्याबरोबरच संशयितांचा मागमूस यासारख्या कामांमध्ये पोलिसांना त्यांच्या महत्त्वाच्या कर्तव्यात मदत करण्यासाठी विशेष प्रशिक्षित श्वानपथके महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. या श्वानांच्या हाताळणीची जबाबदारी आता महिला कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. स्त्रिया नैसर्गिकरित्या अधिक दयाळू असल्यामुळे महिला जनरल ड्युटी अधिकाऱ्यांना अर्ज करण्यास सांगण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार अर्ज प्राप्त झाल्यानंतर उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखत, स्वभाव, निर्भयता आणि ते प्राण्यांची आक्रमकता आणि राग किती प्रमाणात सहन करू शकतात यासारख्या मूलभूत मापदंडांवर त्यांची निवड करून प्रशिक्षण देण्यात आल्याची माहितीही सिन्हा यांनी दिली. या महत्त्वाच्या जबाबदारीवर नियुक्त करण्यात आलेल्या तीन महिला कर्मचारी गुजरात, बिहार आणि उत्तराखंड राज्यातील असल्याचेही सांगण्यात आले.