महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

स्पोर्ट्स mania

06:00 AM Dec 15, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

फिरकीच्या विश्वातील उगवता ‘रवी’ !

Advertisement

भारताचा गोलंदाजीतील उगवता तारा रवी बिश्नोईनं नुकतंच अफगाणिस्तानचा प्रसिद्ध फिरकीपटू रशिद खानला खाली खेचून ‘टी-20’तील अव्वल गोलंदाजाचं स्थान हस्तगत केलंय...ही झेप घेताना त्यानं श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा नि महेश थीक्षाना, इंग्लंडचा आदिल रशिद यासारख्यांनाही मागं टाकलं...‘टी-20’ विश्वचषक झपाट्यानं जवळ पोहोचत असताना बिश्नोईनं या प्रकारातील भारताचा सर्वांत घातक फिरकीपटू म्हणून आपलं स्थान मागील काही काळात निश्चितच मजबूत केलंय...

Advertisement

भारताला लेगस्पिनरच्या बाबतीत मोठी परंपरा लाभलीय...त्यात सुभाष गुप्ते, भागवत चंद्रशेखर यांच्यापासून नरेंद्र हिरवाणी, अनिल कुंबळेपर्यंत अनेकांचा समावेश होतो. आता आणखी एक नाव आपली छाप उमटवू लागलंय, ‘लंबी रेस का घोडा’ ठरण्याची चिन्हं दाखवू लागलंय...रवी बिश्नोई...दक्षिण आफ्रिकेच्या सध्या चालू झालेल्या दौऱ्याच्या आधी मायदेशी खेळविण्यात आलेल्या ‘टी-20’ मालिकेत भारतानं ‘वनडे’ विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाचा 4-1 असा फडशा पाडून दाखविला. त्यात राजस्थानच्या या युवा फिरकी जादुगाराचा मोलाचा वाटा राहिला...त्याशिवाय त्या मालिकेनं 23 वर्षीय बिश्नोईला वैयक्तिक आघाडीवर गाठून दिला तो आणखी एक मैलाचा दगड. ‘टी-20’च्या ताज्या ‘आयसीसी’ क्रमवारीत गोलंदाजांच्या विभागात तो अव्वल स्थानी झळकलाय...

रवी बिश्नोईनं ‘टी-20’च्या विश्वात पाऊल ठेवलं ते गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये. तेव्हापासून तो फक्त 21 सामने खेळलाय. परंतु फसवी ‘गुगली’ अन् फलंदाजाला बेमालूमपणे चकविणारी विविधता यामुळं तो इतर गोलंदाजांहून ठसठशीतपणे उठून दिसलाय. त्यानं ‘टी-20’मध्ये 7.14 इतका प्रभावी ‘इकोनॉमी रेट’ आणि 17.38 च्या सरासरीसह एकूण 34 बळी घेतलेत. ही कामगिरी निश्चितच दाद द्यायला भाग पाडणारी. कारण क्रिकेटचा हा सर्वांत लहान प्रकार ‘गोलंदाजांचा कत्तलखाना’ म्हणून ओळखला जातो. अशा परिस्थितीत एका फिरकीपटूनं, खास करून लेगस्पिनरनं ठसा उमटविणं हे लक्षणीय...

रवी बिश्नोईच्या कारकिर्दीनं एक नवीन शिखर गाठलं ते ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या मालिकेत. त्यात या युवा फिरकीपटूनं 18.22 च्या सरासरीनं एकूण नऊ बळी घेतले. पाच सामन्यांमध्ये त्याच्या गोलंदाजीचे आकडे कसे प्रभावी राहिले ते पाहणं उद्बोधक ठरेल...32 धावांत 3 बळी, 32 धावांत 2 बळी, 29 धावांत 2 बळी, 17 धावांत 1 बळी अन् 54 धावांत 1 बळी...चौथ्या सामन्यानंतर बिश्नोई गोलंदाजी प्रशिक्षकाला म्हणाला होता, ‘मी माझ्या गोलंदाजीवर खरंच खूप आनंदित आहे. भविष्यातही अशीच कामगिरी करत राहीन’...त्याचा वेगानं येणारा ‘टॉपस्पिन’ आणि घातक ‘गुगली’ यांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांना गोंधळवून टाकलं. या मालिकेत सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणून उभरला तो रवीच. त्यामुळं मालिकावीराचा किताब त्याच्याकडे चालून जाणं यात नवल वाटण्याजोगं काही नव्हतं...

या चमकदार कामगिरीमुळं श्रीलंकेचा महान क्रिकेटपटू आणि सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी एक मुथय्या मुरलीधरन यालाही त्याची प्रशंसा केल्याशिवाय राहवलं नाही. मग भारताच्या इतर फिरकीपटूंपासून तो कसा वेगळा आहे याचं विश्लेषण करताना मुरलीधरननं सांगितलं, ‘भारताला प्रत्येक पिढीमध्ये फिरकीपटूंचा चांगला संच लाभलाय. अनिल कुंबळेपासून रविचंद्रन अश्विनपर्यंत आणि आता जे तऊण खेळाडू आलेत त्यांच्याकडे पाहता बिश्नोई हा इतर लेगस्पिनरपेक्षा वेगळा. तो वेगानं गोलंदाजी करून चेंडूला भरपूर ‘स्लाईड’ करतो. अक्षर पटेल खूप अचूक आहे, पण तो चेंडू फारसा वळवत नाही. वाशी (वॉशिंग्टन सुंदर) देखील अक्षरसारखाच. तोही चेंडू जास्त वळवत नाही, मात्र खूप अचूक नि थोडासा जास्त वेगानं गोलंदाजी करतो’...

रवी बिश्नोई सर्वप्रथम प्रकाशझोतात आला तो 2020 साली 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत 17 बळींनिशी आघाडीचा गोलंदाज ठरल्यानं. त्या स्पर्धेत बांगलादेशनं चषक उचलण्यात यश मिळवून भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं...याभरात बिश्नोईनं काही विक्रमही मोडीत काढले. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात चार बळी घेण्याच्या बाबतीत तो पियुष चावला (2006) नि संदीप शर्मा (2012) यांच्या पंक्तीत दाखल झाला. याशिवाय शलभ श्रीवास्तव (2000), अभिषेक शर्मा (2002), कुलदीप यादव (2014) व अनुकूल रॉय (2018) यांना मागं टाकून एका विश्वचषक स्पर्धेत भारतातर्फे सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरण्याचा मान देखील त्यानं पटकावला...

यंदा अहमदाबादमध्ये एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक हाती येता येता निसटल्यानंतर आता भारताला वेध लागलेत ते कॅरिबियन भूमीत नि अमेरिकेत होणार असलेल्या ‘टी-20’ विश्वचषकाच. त्यासाठीचा संघ निश्चित करण्यावर सध्या लक्ष केंद्रीत झालंय. पण गोलंदाजीचा विचार करताना बिश्नोईकडे दुर्लक्ष करणं कठीण...विशेष म्हणजे जेव्हा जेव्हा संधी मिळालीय तेव्हा तेव्हा त्यानं चमकदार कामगिरी करून दाखविलीय. त्याचा ‘इकोनॉमी रेट’ हा भारताच्या सध्याच्या गोलंदाजांमधील सर्वोत्कृष्ट आकड्यांपैकी एक. असं असलं, तरी विश्वचषकात धडाका दाखविण्याचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आगामी मोजक्या ‘टी-20’ लढती नि ‘आयपीएल’मधील बिश्नोईच्या कामगिरीवर बरंच काही अवलंबून राहील !

अन् स्वत:च उभारली क्रिकेट अकादमी...

5 सप्टेंबर, 2000 रोजी जन्मलेला रवी बिश्नोई हा राजस्थानच्या जोधपूरमधील बिरामी गावातील...पश्चिम राजस्थानमधील क्रिकेट संस्कृतीचा अभाव नि प्रशिक्षणासाठी असलेल्या अपुऱ्या सुविधा यामुळं त्यानं काही मित्र व प्रशिक्षकांच्या मदतीनं स्वत:च क्रिकेट अकादमी उभारण्यासाठी पुढाकार घेतला. उद्दिष्ट होतं ते नीट प्रशिक्षण घेता यावं हे. त्यापोटी या सर्वांनी आर्थिक अडचणींमुळं प्रसंगी गवंडीकामही करण्यास मागंपुढं पाहिलं नाही. मग त्याला दिलं गेलं ‘स्पार्टन्स क्रिकेट अकादमी’ असं नाव...

खडतर प्रवास...

चार वर्षांत मोठी झेप...

खेळ जुनाच, ओळख नवी : ड्युबॉल...

विविध खेळांचं मिश्रण असलेल्या ‘ड्युबॉल’चा महाराष्ट्रातील नागपुरात उगम नि विकास झाला अन् तिथून त्याचा झपाट्यानं प्रसार झाला...भारत त्याला खऱ्या अर्थानं ‘मेड इन इंडिया’ क्रीडाप्रकार म्हणू शकतो. आता तो 25 देशांमध्ये पोहोचलेला असल्यानं त्याला आंतरराष्ट्रीय खेळाचं स्वरुप आलंय...

जिद्दीपुढे आकाश ठेंगणे

शारीरिक व्यंग असूनही सतत हसत खेळत राहून समाजाला ऊर्जा देणारे मोजकेच असतात. त्यापैकी एक म्हणजे सिंधुदुर्ग जिह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील तुळस गावाची प्राजक्ता माळकर म्हणजेच ‘जपा’. तिने आपल्या कर्तृत्वानं सर्वांची मने जिंकली. आता तर तिने राष्ट्रीय दिव्यांगांच्या उमंग राष्ट्रीय करंडक महिला क्रिकेट स्पर्धेत सहभाग घेत आणखी एक झेप घेतली आहे. खेळात हारजीत असतेच. पण मैदानावर उतरणे महत्वाचे. त्यामुळेच ‘जपा’ कौतुकास पात्र ठरली आहे. भोपाळ येथे झालेल्या स्पर्धेत सहभागी झालेला महाराष्ट्र संघ आता परतलाय. पण खूप अनुभव गाठीशी घेऊन.

जपाचा प्रवास खूपच खडतर झालाय. लहानपणीच तिने आईवडील गमावले. शारीरिक व्यंग घेऊन जगायचे म्हणजे दिव्य होते. तिला आधार होता तो आत्येचा.  तेथूनच तिचा जीवन प्रवास सुरू झाला. हा प्रवास कुठे नेणार, याचा पत्ताच नव्हता. मग तिने बहिणीसोबत काही व्हिडिओ केले. ते यू ट्यूबवर फेमस झाले. तिला नाव मिळाले. पण म्हणून जगण्याचा संघर्ष संपला नाही. मधल्या काळात तिची बहीण लग्न होऊन सासरी गेली. पुन्हा ‘जपा’चा एकटीचा प्रवास सुरू झाला. या काळात ती साहस अपंग प्रतिष्ठानच्या ऊपाली पाटील यांच्या संपर्कात आली. त्यांनी तिला प्रोत्साहन दिले. अलिकडेच दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्डातर्फे भोपाळ येथे राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा झाली. त्या स्पर्धेत महाराष्ट्रातर्फे खेळण्याची संधी प्राजक्ता माळकर हिला मिळाली. या स्पर्धेत जम्मू काश्मीर संघाने विजेतेपद मिळविले. राजस्थान संघ उपविजेता ठरला.

स्पर्धा म्हटले की हारजीत आलीच. पण राष्ट्रीय पातळीवर खेळण्याचा अनुभव मिळाला. संघ मॅनेजर रत्नागिरीच्या दीपाली पवार आणि कोच वासुदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचा संघ भोपाळ येथे गेला होता. संघात पुणे येथून 2, सांगली 3 तर सिंधुदुर्गच्या 4 महिला सहभागी होत्या. तर अन्य 3 होत्या. मात्र ऐनवेळी 3 खेळाडू अनुपस्थित राहिल्याने तेथे अन्य खेळाडूंना संधी द्यावी लागली. स्पर्धेसाठी किट, बूट हे सर्व साहित्य जमविताना दमछाक झाली. पण जिद्द होती. त्या जोरावर हा संघ पहिल्याच राष्ट्रीय स्पर्धेत खेळला. ही स्पर्धा खूप अनुभव देऊन गेली.  दिव्यांगांचे आयुष्य हीच एक मोठी स्पर्धा असते. जगताना येणारी निराशा झटकून पुढे जावे लागते. आज शासनस्तरावर दिव्यांगांसाठी अनेक स्कीम आहेत. पण त्यांना गरज आहे ती मानसिक आधाराची. आज प्राजक्ता हिला संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन मिळते. पण ती फारच अल्प आहे. तिला अजून अनेक मैदाने मारायची आहेत. त्यासाठीची जिद्द तिच्याकडे आहे. आज भोपाळहून स्पर्धा आटोपून परत येताना त्यांच्याकडे कन्फर्म तिकिटेही नव्हती. हा प्रवासही कसाबसा झाला. अजून पुढे बराच पल्ला गाठायचा आहे.

-राजेश मोंडकर

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article