For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील खेळाचे साहित्य मोडकळीस

12:22 PM Jun 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील खेळाचे साहित्य मोडकळीस
Advertisement

दुरुस्तीकडे महानगरपालिकेचे दुर्लक्ष : पालकवर्गातून तीव्र नाराजी : बहुतांश उद्यानांची परिस्थिती बिकट

Advertisement

बेळगाव : महानगरपालिका आणि बुडाच्या अखत्यारित येणाऱ्या शहर व उपनगरांतील बहुतांश उद्यानांची देखभालीअभावी दुरवस्था झाली आहे. मात्र, दुरुस्तीकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले असल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील लहान मुलांच्या खेळण्याचे साहित्य पूर्णपणे नादुरुस्त झाले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी खेळण्या-बागडण्यासाठी आलेल्या मुलांना धोकादायक स्थितीत असलेले पाळणे व घसरगुंडीमध्ये खेळण्याची वेळ आली आहे. याकडे महानगरपालिकेने लक्ष घालून उद्यानातील खेळण्याच्या साहित्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे.

शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्यानांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र, त्यांच्या देखभालीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असल्याने बहुतांश उद्यानांची परिस्थिती बिकट झाली आहे. शोभेच्या झाडांचे नुकसान होण्यासह पथदीप बंद स्थितीत आहेत. उद्यानात फिरावयास येणाऱ्या नागरिकांना आवश्यक असलेले पदपथदेखील धोकादायक स्थितीत आहेत. अनेक उद्यानांमध्ये नागरिकांऐवजी मोकाट जनावरे आणि भटकी कुत्री ठाण मांडून बसलेली असतात. मोकाट जनावरांकडून तेथील झाडांचे नुकसान करण्यासह अस्वच्छता केली जात आहे. त्यामुळे यापूर्वी झालेल्या महानगरपालिकेच्या स्थायी समिती बैठकीत शहरातील उद्यानांच्या देखभालीवरून अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले होते.

Advertisement

मात्र, तरीही अद्याप उद्यानांच्या देखभालीकडे अधिकाऱ्यांनी लक्ष दिलेले नाही. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात शिवसृष्टी सुरू झाल्यापासून त्या ठिकाणी सकाळ व संध्याकाळी फिरावयास येणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. त्याचबरोबर लहान मुलेदेखील खेळण्यासाठी येत असतात. मात्र, त्यांच्यासाठी असलेले खेळण्याचे साहित्य मोडकळीस आले आहे. पाळणे, घसरगुंडी व इतर प्रकारचे साहित्य खराब झाले आहे. तशा धोकादायक स्थितीत असलेल्या खेळण्याच्या साहित्यावर लहान मुले खेळत असल्याने एखादी दुर्घटना घडल्यानंतरच महापालिकेला जाग येणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. याकडे स्थानिक नगरसेवकांनी तसेच मनपा अधिकाऱ्यांनी लक्ष घालून मोडकळीस आलेले उद्यानातील खेळण्याचे साहित्य दुरुस्त करावे, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

Advertisement
Tags :

.