सपा-काँग्रेस फॉर्म्युला निश्चित
उत्तर प्रदेशात काँग्रेस 17 जागा लढणार
वृत्तसंस्था/ लखनौ
2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांच्यात जागांवरून सुरू असलेली रस्सीखेच बुधवारी संपुष्टात आली. जागांबाबत दोन्ही पक्षांमध्ये समझोता झाला आहे. सपाने काँग्रेसला वाराणसी आणि प्रयागराजसह एकूण 17 जागा दिल्या आहेत. सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेससोबत युती करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या दोन्ही पक्षांमध्ये युती करण्यात प्रियांका गांधी-वधेरा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
बऱ्याच चढ-उतारानंतर उत्तर प्रदेशमध्ये ‘इंडिया’ आघाडी अंतर्गत समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपाचा करार झाला आहे. त्यानुसार काँग्रेस उत्तर प्रदेशमध्ये 17 जागांवर निवडणूक लढवणार आहे. वरिष्ठ नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेअंती जागानिश्चिती करण्यात आली होती. मात्र, अंतिम क्षणी 17 जागांपैकी काँग्रेसने दोन जागांवर बदल करण्याची मागणी केली. काँग्रेसने बुलंदशहर आणि हाथरसऐवजी सीतापूर आणि श्रावस्तीच्या जागा मागितल्या. अखिलेश यादव यांनी हा प्रस्ताव मान्य केल्याचे बोलले जात आहे.
उत्तर प्रदेशमध्ये ‘इंडिया’ आघाडीत काँग्रेसला 17 जागा मिळाल्या आहेत. रायबरेलीशिवाय अमेठी, कानपूर, फतेहपूर सिक्री, बांसगाव, सहारनपूर या जागांचा समावेश आहे. याशिवाय काँग्रेसचे उमेदवार प्रयागराज, महाराजगंज, वाराणसी, अमरोहा, झाशी, बुलंदशहर, गाझियाबाद, मथुरा, सीतापूर, बाराबंकी आणि देवरिया येथे आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत. आता उमेदवार निश्चित होताना एक-दोन मतदारसंघात किरकोळ बदल करण्याची तयारी दोन्ही पक्षांनी ठेवली आहे.
समाजवादी पक्षाकडून 31 उमेदवारांची घोषणा
समाजवादी पक्षाने आतापर्यंत 31 उमेदवारांची घोषणा केली आहे. सपाने संभल, बदाऊन, फिरोजाबाद, मैनपुरी, एटा, खेरी, धौराहारा, उन्नाव, लखनौ, फाऊखाबाद, अकबरपूर, बांदा, फैजाबाद, आंबेडकरनगर, बस्ती, गोरखपूर, कैराना, बरेली, हमीरपूर, वाराणसी, मुजफ्फरनगर, शहापूर, हरदोई, अमला, बरैली, वाराणसी, मिसरिख, मोहनलालगंज, प्रतापगड, बहराइच, गोंडा, गाझीपूर आणि चंदौली जागांसाठी उमेदवार घोषित करण्यात आले आहेत.
प्रियांका-अखिलेश यांच्यात बोलणी
युतीची घोषणा होण्याच्या अवघ्या तासापूर्वी प्रियांका गांधी यांनी अखिलेश यादव यांच्याशी फोनवर चर्चा केली, त्यानंतर युती निश्चित झाली. बुलंदशहर किंवा आग्राऐवजी श्रावस्तीची जागा देण्यावर अखिलेश यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करत संध्याकाळपर्यंत उत्तर देण्यास सांगितले. त्यानंतरच दोन्ही नेत्यांचे एकमत झाले आणि युतीवर शिक्कामोर्तब झाले. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा 24 फेब्रुवारीपासून मुरादाबाद येथून पुन्हा सुरू होत असून त्यामध्ये प्रियांका गांधी पहिल्यांदाच सहभागी होणार आहेत. त्यामुळे त्यापूर्वी दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाचा करार पूर्ण व्हावा, अशी प्रियांका यांची इच्छा होती. आता जागानिश्चितीची बोलणी पूर्ण झाल्यामुळे समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव हेसुद्धा यात्रेत सहभागी होऊ शकतात.