तर भविष्यात निवडणूक होणारच नाही !
या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुन्हा विजय झाला, तर भारतात पुन्हा निवडणूकच होणार नाही, असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे. झारखंडमधील हजारीबाग येथे प्रचार सभेत बोलताना त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या धोरणांवर जोरदार टीका केली.
केंद्र सरकारने झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केली. तथापि, हे सरकार अदानी आणि अंबानी यांना हात लावणार नाही. या सरकारने त्यांना अटक करुन दाखवावी, असे आव्हान त्यांनी दिले. देशात लोकशाही आणि घटना यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात मोठा धोका निर्माण झाला आहे. या सरकारने विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांना अटक केली आहे. त्यांना त्वरित सोडले जावे, अशी आमची मागणी आहे. या नेत्यांना प्रचार करता येऊ नये, म्हणून त्यांच्यावर खोटे गुन्हे लावून त्यांना अटक केल्याचा आरोप त्यांनी केला.