...तर देशाची प्रगती झपाट्याने
अप्पर मुख्य सचिव शालिनी रजनीश यांचे मत : बाबासाहेबांना अभिवादन
बेळगाव : भारतीय राज्य घटनेने स्वातंत्र्य, समता यांचे मूल्य महत्त्वाचे मानले आहे. हक्कांबरोबरच जबाबदारीची जाणिव करून दिली आहे. घटनेतील मूल्यांचे संस्कार आपण तरुण पिढीवर केल्यास देशाची प्रगती झपाट्याने होईल, असे मत सरकारच्या अप्पर मुख्य सचिव शालिनी रजनीश यांनी व्यक्त केले. कन्नड आणि संस्कृती खात्यातर्फे सुवर्ण विधानसौधच्या सभागृहात दि. 6 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.त्या म्हणाल्या, देशाच्या ग्रामीण भागामध्ये मुलींना उच्चशिक्षण मिळत नाही. बाल विवाहांना त्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कुपोषितपणाही वाढत आहे. याचे निवारण करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. आजच्या युवकांनी शिक्षणाबरोबर क्रीडा, कला, संगीत, साहित्य अशा विविध कौशल्यांमध्येही यश मिळविले पाहिजे. या निमित्ताने विविध स्पर्धा शाळा व कॉलेज विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आल्या. विजेत्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. याप्रसंगी कन्नड व संस्कृती खात्याच्या उपसंचालक विद्यावती बजंत्री, आरसीयूच्या कुलसचिव राजश्री जैनापुरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.