वृक्षांची कत्तल; तरीही वनखाते सुस्त!
बेळगाव : शहरात ठिकठिकाणी झाडांच्या फांद्या छाटल्या जात आहेत, काही ठिकाणी झाडांचीच कत्तल केली जात आहे. मात्र यासाठी संबंधितांनी परवानगी घेतली आहे का? हा प्रश्न आहे. अनेकदा रात्रीच्या अंधारात किंवा पहाटेच्यावेळी झाडांच्या फांद्या छाटल्या जात असून वनखाते आणि महानगरपालिकेने याकडे वेळीच लक्ष द्यावे, अशी मागणी वृक्षप्रेमी करत आहेत. नुकतीच आरपीडी रस्त्यावरील अजेंटा कॅफेसमोरील दुभाजकांवर असलेल्या झाडांच्या फांद्या छाटण्यात आल्या आहेत. मात्र हे काम कोणी केले? याचा काही पत्ता नाही. पहाटेच्यावेळी या फांद्या छाटण्यात आल्याचे तेथील नागरिक सांगत आहेत. सध्या उन्हाचा तडाखा वाढल्याने लोक शक्यता जेथे तेथे सावली शोधत आहेत. अशावेळी झाडांच्या फांद्या छाटण्यामध्ये कोणाचे हीत आहे? असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. भाग्यनगर येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक अवर्सेकर यांनी फांद्या छाटल्याच्या घटनेची माहिती घेवून तेथील दुकानदारांशी त्वरित संपर्क साधला व असे कृत्य कोणी करत असल्यास आपल्याला त्वरित कळवा, असे आवाहन केले. दरम्यान, महानगरपालिकेला याबाबत विचारणा करता पालिकेने ती झाडे तोडली नसल्याचे स्पष्ट केले. नुकतेच टिळकवाडी येथील आगरकर रोड असलेले दोन मोठे वृक्ष जमीनदोस्त करण्यात आले आहेत.. याचीसुद्धा वनखात्याला अथवा मनपाला कल्पना आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.