भीषण अपघातात सहा ठार, दोन गंभीर
विजापूर जिल्ह्यातील मनगोळी येथील दुर्घटना : कार, कंटेनर, खासगी बसमध्ये तिहेरी अपघात : सुदैवाने बसमधील प्रवाशी बचावले
कार, कंटेनर व खासगी बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात सहाजण जागीच ठार झाल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील बसवनबागेवाडी तालुक्यातील मनगोळी शहराजवळ राष्ट्रीय महामार्ग 50 वर बुधवारी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच तर खासगी बसचालकाचा उपचारासाठी हलविताना मृत्यू झाला. या भीषण अपघातात तिन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे. कारमधील पी. भास्कर (वय 36), त्यांच्या पत्नी पवित्रा (वय 34), मुलगा अभिराम (वय 14) आणि मुलगी जोत्स्ना (वय 12, सर्व रा. तेलंगणा), कारचालक विकास मुकणी (वय 30, रा. होर्ती) व बसचालक बसवराज लमाणी (वय 48) अशी मृतांची नावे आहेत. तर अपघातात कारमधील 10 वर्षाचा मुलगा प्रवीणतेज, बसमधील प्रवाशी बाळासाहेब मुरलीधर कणसे (वय 39, रा. पुणे) गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने बसमधील अन्य प्रवाशी सुखरूप आहेत. महिंद्रा बोलेरो कार ही विजापूरकडे जात असताना नियंत्रण सुटल्याने दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या खासगी बसला धडकली. या धडकेत बसचालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर बस आदळली.
मंत्री पाटील यांच्याकडून जखमींची विचारपूस
अपघातात कारमध्ये जखमी झालेल्या मुलास नजीकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या प्रकृतीची साखर मंत्री शिवानंद पाटील यांनी विचारपूस केली. तसेच त्याच्यावर योग्य उपचार करावेत. तसेच गरज भासल्यास सदर मुलाला अधिक उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलविण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले.