'पाटबंधारे विभागा'चा निषेध, चक्क तलावाच्या पाण्यात बसून अनोखे आंदोलन
आटपाडी तलावात नादुरूस्त केबलमुळे दोन शेतकऱ्यांचे बळी गेले आहेत
आटपाडी : तलावाच्या भरावावरील काटेरी झुडपे आणि शेतीपंपाच्या वीजेच्या खराब झालेल्या केबल बदलण्याच्या मागणीसाठी आटपाडी तलावाच्या पाण्यात बसून सोमवारी 'जल आंदोलन' करण्यात आले. रासपचे तालुकाध्यक्ष शुभम हाके, माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब मेटकरी, चंद्रकांत हा यांनी चक्क तलावातील पाण्यात बसुन आटपाडी पाटबंधारे विभागाचा निषेध केला.
आटपाडी तलावाच्या भरावावर आणि आतील खुल्या जागेत मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढली आहेत. पाणीपुरवठ्यासह शेतीपंपाचे शेकडो कनेक्शन येथे आहेत. झुडपांमुळे तलावाचा भराव आणि परिसराची सुरक्षा धोक्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मोटारीच्या केबल तुटलेल्या, त्यावरील अवरण नष्ट झालेले असून या केबलव्दारे वीजेचा धक्का बसण्याचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत पाटबंधारे विभागाने तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी करत शुभम हाके, बाळासो मेटकरी चंद्रकांत हाके यांनी पाण्यात बसुन आंदोलनाची भुमिका स्विकारली.
जिल्हा नियोजन समितीचे सदस्य लक्ष्मण सरगर, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, सिध्देश्वर लवटे, महेश पाटील, विशाल काटे, विकास सरगर, युवराज सरगर, अमर दडस आदिंनी तलावातील पाण्यात बसुन सुरू असलेल्या आंदोलनाला भेट देत पाठिंबा दर्शविला. राजेंद्र खरात यांनी पाटबंधारेचे शाखा अधिकारी महेश पाटील यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला असता त्यांनी आपल्याला आंदोलनाची कल्पना नसल्याचे सांगितले.
आंदोलनकर्त्यांनी पाटबंधारे विभागाला निवेदन देवूनही शाखा अधिकाऱ्यांनी आंदोलनाची माहिती नसल्याचे सांगितल्याने राजेंद्र खरात यांनी संताप व्यक्त केला. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य लक्ष्मण यांनी संतोष पवार यांच्याशी संपर्क साधून तात्काळ काटेरी झुडपांचे उच्चाटन व खराब केबल असलेल्या शेतकऱ्यांना सुचना करून हे प्रश्न सोडविण्याची मागणी केली.
यापुर्वी आटपाडी तलावात नादुरूस्त केबलमुळे दोन शेतकऱ्यांचे बळी गेले आहेत. त्यामुळे काटरी झुडपे व केबलचा प्रश्न तात्काळ सोडवावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. पाटबंधारे विभागाने लेखी पत्र देवुन चिलार हटविण्याचे काम सुरू करण्यात आले असुन विद्युत मोटारीच्या केबल सुस्थितीत ठेवण्यासाठी सर्व उपसाधारकांना नोटीस देण्याची कार्यवाही चालु असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन करण्यात आले.