सिसोदियांचे ‘तिहार’मधून कार्यकर्त्यांना भावुक पत्र
लवकरच बाहेर भेटू, लव्ह यू ऑल!’ असा संदेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनिष सिसोदिया यांनी तिहार कारागृहातून जनतेला पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी आपण लवकरच तुरुंगातून बाहेर येणार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी हे पत्र आपल्या पटपरगंज विधानसभा मतदारसंघातील लोकांसाठी लिहिले आहे. मद्य घोटाळ्यातील आरोपी संजय सिंह यांना जामीन मंजूर होताच ते तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सिसोदिया यांचे हे पत्र आल्यामुळे आता तेही बाहेर पडतील... अशी चर्चा सध्या सुरू आहे.
मनिष सिसोदिया हे सध्या दिल्लीतील तिहार तुरुंगात आहेत. बहुचर्चित मद्य धोरण घोटाळ्यात त्यांना संशयित आरोपी करण्यात आले आहे. गेल्या वर्षभरापासून ते तुरुंगात असून जामिनासाठी वारंवार प्रयत्न करत आहेत. याचदरम्यान सिसोदिया यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून पत्र लिहिले आहे. गेल्या एका वर्षात आपण सर्वांना मिस केले. सर्वांनी मिळून प्रामाणिकपणे काम केले, असा उल्लेखही त्यांच्या पत्रात आहे.
दिल्ली न्यायालयात जामीन सुनावणीच्या एक दिवस आधी, तुरुंगात असलेले आप नेते मनिष सिसोदिया यांनी दिल्लीच्या जनतेला उद्देशून एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी आपल्या आजारी पत्नीची काळजी घेतल्याबद्दल त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील पटपरगंजमधील लोकांचे आभार मानले. तिहार तुरुंगातून हिंदीत लिहिलेले त्यांचे दुसरे पत्र शुक्रवारी उघडकीस आले. पत्रात त्यांनी आपल्या तुरुंगवासाची तुलना स्वातंत्र्य चळवळीदरम्यान ब्रिटिशांनी तुरुंगात टाकलेल्या लोकांशी केली होती. तसेच आपण महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला यांच्यासारख्या नेत्यांपासून प्रेरित असल्याचेही म्हटले आहे.