सिद्धरामय्यांचा स्पष्टवक्तेपणा अंगलट?
मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे अनेक वेळा आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे ठळक चर्चेत असतात. सध्या भाजप नेत्यांकडून त्यांच्यावर टीका होतेच. सोशल मीडियावरही पाकिस्तान टीव्ही चॅनेल्समध्ये प्रसारित झालेल्या बातम्यांच्या क्लिप फिरविण्यात येत आहेत. हा मुद्दा गंभीर होताच हायकमांडने वादग्रस्त वक्तव्य करू नये, अशी सूचना केली आहे. मुख्यमंत्रीही सातत्याने समाजमाध्यमांवर ट्रोल झाल्यानंतर त्यांच्या मदतीला मंत्रिमंडळातील सहकारी धावले आहेत.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. दहशतवाद आणि दहशतवाद्यांचा बीमोड करावा, या मागणीसाठी गावोगावी निदर्शने सुरू आहेत. अशा परिस्थितीत राजकीय नेत्यांमध्येही चांगलाच संघर्ष सुरू आहे. पाकिस्तानवर कोणत्याही क्षणी हल्ला होऊ शकतो. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. दहशतवादावर वादग्रस्त वक्तव्य कोणी करू नये, अशी सूचना काँग्रेसच्या हायकमांडने आपल्या नेत्यांना दिली आहे. भाजपने गावोगावी सिद्धरामय्या यांचा निषेध नोंदवण्याचे काम हाती घेतले आहे. सद्यपरिस्थितीत पाकिस्तानसोबत युद्धाची गरज नाही. पाकिस्तानला नमवण्याचे इतर अनेक पर्याय आहेत. युद्ध हा शेवटचा पर्याय ठरू शकतो, असे म्हैसूरमध्ये मुख्यमंत्री बोलले होते. विरोध वाढताच सिद्धरामय्या यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरणही दिले आहे. पाकिस्तानच्या टीव्ही चॅनेल्सवर मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य जोरात प्रसारित करण्यात आले आहे. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनीही भारताने पाकिस्तानसोबत युद्ध करू नये, असा सल्ला दिल्याचा प्रचार पाकिस्तानमध्ये सुरू आहे.
एकीकडे कर्नाटकात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून राज्य सरकारच्या विरोधात जनआक्रोश यात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेच्या निमित्ताने वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन सरकारविरुद्ध भाजप नेते टीकेची झोड उठवू लागले आहेत. दुसरीकडे काँग्रेसनेही महागाईविरुद्ध व संविधान बचाव मोहीम हाती घेतली आहे. रविवारी बेळगावात हा कार्यक्रम झाला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह काँग्रेसचे केंद्रीय नेते व मंत्रिमंडळातील बहुतेक मंत्री या कार्यक्रमात सहभागी झाले होते. मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू झाले, त्यावेळी भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सिद्धरामय्या यांना काळ्या फिती दाखवून ‘गो बॅक पाकिस्तान’च्या घोषणा दिल्या. काँग्रेसच्या मेळाव्यात शिरून घोषणाबाजी करणाऱ्या सहा महिला कार्यकर्त्यांना अटकही झाली. याचवेळी संताप अनावर झालेल्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारविरुद्ध तर टीकेची झोड उठवलीच. बंदोबस्तावर असलेले धारवाडचे अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख एन. व्ही. बरमणी यांच्यावर हात उचलला. कार्यक्रमात झालेल्या घोषणाबाजीमुळे मुख्यमंत्र्यांचा संयम ढासळल्याचे दिसून आले.
मुख्यमंत्र्यांवर सर्वत्र टीका होत आहे. पोलीस अधिकाऱ्यावर हात उचलण्याचा प्रकार योग्य आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. भाजपने तर मुख्यमंत्र्यांविरुद्ध रस्त्यावरची लढाई तीव्र केली आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. निष्पाप पर्यटकांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी दबाव वाढतो आहे. अशा परिस्थितीत कर्नाटकात याच मुद्द्यावर राजकीय नाट्या रंगले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे अनेक वेळा आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे ठळक चर्चेत असतात. सध्या भाजप नेत्यांकडून त्यांच्यावर टीका होतेच. सोशल मीडियावरही पाकिस्तान टीव्ही चॅनेल्समध्ये प्रसारित झालेल्या बातम्यांच्या क्लिप फिरविण्यात येत आहेत. हा मुद्दा गंभीर होताच हायकमांडने वादग्रस्त वक्तव्य करू नये, अशी सूचना केली आहे. मुख्यमंत्रीही सातत्याने समाजमाध्यमांवर ट्रोल झाल्यानंतर त्यांच्या मदतीला मंत्रिमंडळातील सहकारी धावले आहेत. पाकिस्तान हा देश दहशतवाद व दहशतवाद्यांचा पोशिंदा आहे. त्याला अद्दल घडवलीच पाहिजे, अशी भूमिका मांडत डॅमेज कंट्रोल सुरू करण्यात आले आहे.
बेळगाव येथील संविधान वाचवा मेळाव्यात भाजप महिला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्यानंतर आता आमचेही गावोगावी कार्यकर्ते आहेत. तुम्हीही कार्यक्रम करून दाखवा, असा धमकीवजा इशारा काँग्रेस नेत्यांनी भाजपला दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात काळे झेंडे दाखवणे कितपत योग्य आहे? असा प्रश्नही काँग्रेस नेत्यांनी उपस्थित केला आहे. या एका घटनेमुळे आता दोन्ही पक्षांतील राजकीय संघर्ष आणखी वाढण्याचीच चिन्हे अधिक आहेत. गुप्तचर विभागाने बेळगाव पोलिसांना अशी घटना होऊ शकते, अशी स्पष्ट सूचना देऊनही पोलिसांनी खबरदारी का घेतली नाही? याचीही चौकशी करण्याची गरज आहे. कारण बेळगाव येथील पोलीस यंत्रणेत गटबाजी माजली आहे. या गटबाजीमुळेच गुन्हेगारीचा आलेखही वाढतो आहे. चोऱ्या, घरफोड्या मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. एखाद्या शहरातील पोलीस यंत्रणा सुस्तावली तर त्या शहराची अवस्था काय होते, याचा अनुभव सध्या बेळगावकरांना येतो आहे. संविधान वाचवा मेळाव्यात खरेतर मुख्यमंत्र्यांचा रोष बेळगाव येथील पोलीस अधिकाऱ्यांवर होता. त्याचवेळी समोरच दिसलेल्या धारवाडच्या अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुखांवर त्यांचा राग निघाला. जाहीर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर हात उचलण्याचा प्रकार चुकीचा आहे. सरकारमधील अनेक मंत्र्यांनीही ते चुकीचे ठरविले आहे.
गुप्तचर विभागाने सूचना देऊनही पोलीस यंत्रणा गाफील का राहिली? याची चौकशी करण्याची सूचना गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी केली आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांबद्दल व त्याचा पोशिंदा असणाऱ्या पाकिस्तानबद्दल जनमानसात चीड निर्माण झालेली असतानाच मंगळूरजवळील कुडूपू येथे क्रिकेट सामन्यादरम्यान ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणाऱ्या एका युवकाला जमावाने यमसदनी धाडले. जमावाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेला तरुण केरळमधील वायनाड जिल्ह्यातील होता. क्रिकेट सामना सुरू असताना रविवारी हा तरुण तेथे आला. मैदानात त्याने अचानक ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा सुरू केल्या. तो मानसिक अस्वस्थ होता, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. या प्रकरणी पंधरा जणांची धरपकड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणे म्हणजे देशद्रोहच आहे, असे सांगितले आहे. देशाच्या सीमेवर युद्धाचे ढग दाटले आहेत. कोणत्याही क्षणी पाकिस्तानवर हल्ला होऊ शकतो. अशा परिस्थितीत या मुद्द्यावर राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्व जण एकत्र येण्याची गरज आहे. यासाठी राजकीय पक्षांच्या नेत्यांवर सर्वसामान्यांचा दबाव वाढतो आहे.