महामार्गावर शिवशाही बस जळाली
भुईज :
पुणे बेंगलोर महामार्गावर भुईंज बदेवाडी येथे शिवशाही बस जळून खाक झाली. बसमधील तब्बल ४० प्रवास सुरक्षित असून कोणतीही जिवीतहानी झाली नाही. दरम्यान, या शिवशाही बसचा टायर खराब असल्याने टायरने पेट घेतल्यामुळे बस पेटली असल्याचे घटनास्थळी बोलले जात होते. अर्ध्या तासानंतर बसची आग आटाक्यात आणण्यात यश आले.
याबाबतची घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कोल्हापूर डेपोची कोल्हापूर येथून पुण्याला निघालेली शिवशाही बस क्रमांक MH 06 BW 3523 ही पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर भुईंज-बदेवाडी जवळ आली असता शिवशाही बसचे डाव्या साईडचे टायरने पेट घेतला. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ भुईंज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांनी आपले सर्व पोलीस कर्मचारी घटनास्थळी पाठवून तात्काळ मदत सुरू करित शिवशाही बस मध्ये असणारे तब्बल ३५ ते ४० प्रवासी यांना बाहेर काढण्यात यश मिळवले. त्यानंतर तब्बल अर्ध्या तासाने आगीने आपले रौद्ररूप धारण केले. बस एसी असल्याने गाडीच्या सर्वच काचा पॅक होत्या त्यामुळे गाडीच्या आतील बाजूमध्ये आग पसरली गेली. अर्ध्या तासानंतर किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याचा अग्निशामक बंब आला व नंतर वाई नगरपालिकेचा अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यावेळी आगिने रौद्ररूप धारण केलेली शिवशाही बसला विझवण्यात अग्निशामक दलाला यश आले. यावेळी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे महामार्गावर सुमारे पाच ते सहा किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या.
भुईंज पोलिसांना घटनेची माहिती कळताच तात्काळ पीएसआय सुरज शिंदे, शिवाजीराव तोडरमल, आप्पासाहेब कोलवडकर, दत्तात्रय शिंदे, सुहास कांबळे, किरण निंबाळकर, अमोल बागल, शिवाजी जाधव, अजित भोसले, रमेश बरकडे, अविनाश डेरे, योगेश जमदाडे, व जोशीविहिर महामार्ग पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळू वंजारे, किशोर भोसले, बाबासो भिसे, दत्तात्रय जमदाडे, बापूसाहेब ठोंबरे, तुषार हाडके या सर्व पोलिसांनी शिवशाही बस विझवून पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग पूर्ववत सुरू करण्यात यश मिळवले.
- टोल नाका व्यवस्थापनाचे वराती मागून घोडे
दररोज लाखो रुपये टोल गोळा करणारे आनेवाडी टोल नाक्यावरील टोल नाका व्यवस्थापनाचे कर्मचारी, अॅम्बुलन्स, व इतर सेवा शिवशाही बस संपूर्ण विझवल्यानंतर घटनास्थळी दाखल झाले तब्बल एक ते दीड तासाने ही टोलनाका व्यवस्थापनाची यंत्रणा आली. ही यंत्रणा आल्यानंतर घटनास्थळी बघा ही टोलनाक्याची यंत्रणा कशी वराती मागून घोडे येते तशी आली असल्याची चर्चा घटनास्थळी लोक बोलून दाखवत होते.