तिळारी धरण्याच्या पाण्याने शिवोली, कामुर्ली जलमय
कोरड्या पडलेल्या पर्वरीची प्रतिक्षा संपणार
म्हापसा : तिळारी धरण कालव्याच्या दुरुस्तीचे काम सुरु असल्यामुळे गेला दीड महिनाभर तेथून गोव्याला होणारा पाणीपुरवठा बंद होता. दीड महिन्यानंतर बुधवारी धरणाचे पाणी सोडल्यामुळे कोरडा पडलेला बार्देश तालुका सुखावला होता. पण ओसंडून येणारे हे पाणी काल गुरुवारी सडये शिवोली, कामुर्ली भागात पोहोचल्यानंतर कालव्याच्या कड्यांवरुन बाहेर आले आणि अनेक घरांमध्ये घुसले, रस्त्यांवर पसरले त्यामुळे सारा परिसर जलमय झाल्याने त्या परिसरातील लोकांसमोर गुरुवारी मोठी समस्या निर्माण झाली. तिळारी धरण जलसिंचन विभागाने दि. 13 नोव्हेंबर रोजी धरणाच्या कालव्याचे वार्षिक दुरुस्तीकाम हाती घेतले होते. तेव्हापासून बार्देश आणि पेडणे तालुक्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागले. तिळारीहून पाणी येत नसल्याने पाण्याअभावी पर्वरी जलशुद्धीकरण प्रकल्प गेला दीड महिना बंद होता. या कालावधीत पर्वरी आणि साळगाव मतदारसंघातील लोकांना मोठ्या पाणी समस्येला सामोरे जावे लागले होते.
दीड महिन्यानंतर कालव्याचे दुरुस्तीकाम पूर्ण झाल्यावर बुधवारी 27 रोजी पहाटे तिळारी धरणातून गोव्यात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे बार्देश तालुक्यातील पिण्याच्या पाणी टंचाईचा प्रश्न सुटला. मात्र गुरुवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ओसंडून वाहणारे कालव्यातील हे पाणी पिलंबीवाडा सडयेमध्ये घुसले. पाण्याच्या या प्रवाहाला मोठा दाब होता. त्यामुळे पिलंबी वाड्यावरील रस्ते पाण्याखाली गेले. रस्त्यांच्या शेजारील घरांमध्ये हे पाणी घुसून सामानाची नाशाडी झाली. अचानक घरांमध्ये पाणी घुसल्यामुळे लोकांची धांदल उडाली. स्थानिक पंचायत मंडळाला लोकांनी घटनेची माहिती दिली. पंचायत मंडळाने घटनास्थळी धाव घेतली. पंचायतीने जलस्त्राsत खात्याच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. पण दुपारी उशिरापर्यंत पाण्याचा हा प्रवाह कमी झाला नव्हता. सरपंच दीपाली पेडणेकर तसेच स्थानिकांनी या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे. जलस्त्राsत खात्याने यावर त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.