मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळातर्फे शिवराज्याभिषेक दिन साजरा
बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1596 म्हणजेच 6 जून 1674 रोजी रायगड येथे झाला. राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्यावतीने छत्रपती शिवाजी उद्यानात शिवरायांच्या मूर्तीची विधिवत पूजा करून आरती म्हणण्यात आली. यावेळी मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाचे खजिनदार प्रकाश मरगाळे आणि कार्यवाह मदन बामणे यांच्यावतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला. माजी महापौर मालोजी अष्टेकर यांच्याहस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. शहापूर मध्यवर्ती मंडळाच्यावतीने अध्यक्ष नेताजी जाधव आणि सचिव श्रीकांत कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी अमर यळ्ळूरकर, रणजित चव्हाण-पाटील, शिवराज पाटील, धनंजय पाटील, राजू बिर्जे, गणेश दड्डीकर, उमेश पाटील, शेखर पाटील, विनोद आंबेवाडीकर, सचिन केळवेकर, गुंडू कदम, पांडू पट्टण, अनिल आंबरोळे, गणू मेणसे, प्रतिक पाटील, दुर्गेश भातकांडे, सतीश देसाई व शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कित्येक वर्षे गुलामीत राहिलेल्या मराठी मुलुखात नवचैतन्याचा सोहळा 350 वर्षांपूर्वी रायगडावर पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग होता. त्याचे औचित्य साधून बेळगावमध्ये या आनंदसोहळ्याचे 350 वे वर्ष मोठ्या आनंदाने साजरे करण्यात आले.
कोरे गल्ली-शहापूर
बेळगाव : कोरे गल्ली-शहापूर येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ व तरुण मित्र मंडळ यांच्यावतीने छ. शिवाजी महाराजांचा 350 वा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिवप्रतिमेचे पूजन मंडळाचे अध्यक्ष अरुण कडोलकर यांनी केले. महेश पाटील यांनी छ. शिवाजी महाराजांच्या पराक्रमाबद्दल माहिती दिली. यावेळी मंडळाचे कार्यकर्ते कल्लाप्पा हंडे, सुरेश बोकडे, समित पाटील, विजय डम्म, रोहीत वायचळ, दीपक गवंडळकर आदी उपस्थित होते.