'सहयाद्रि'तील वाघांचे शिवकालीन नामकरण
कराड :
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प परिसरातील स्थानिक नागरिकांनी आपल्या व्याघ्र अभिमानाचे दर्शन घडवत वाघांना 'सेनापती', 'सुभेदार' व 'बाजी' अशी लोकप्रिय नावे दिली आहेत. या नावांमुळे स्थानिक लोकांचा वाघांशी असलेला आत्मीय संबंध अधिक दृढ झाला असून, संवर्धनाबरोबरच लोकसहभागाची भावना बळकट झाली आहे.
'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात अधिवास करणाऱ्या वाघांचे नामकरण करण्यात आले आहे. यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात सरदारांना दिलेल्या विविध पदव्यांचा आधार घेण्यात आला आहे. शासकीय कागदपत्रांमध्ये व्याघ्र प्रकल्पातील वाघांना सांकेतिक क्रमांक देण्यात आले आहेत. मात्र पर्यटकांमध्ये वाघांविषयी आकर्षण निर्माण करण्यासाठी स्थानिक निसर्गप्रेमी, गाईड, आणि वनमजुरांकडून या वाघांसाठी वापरण्यात येणाऱ्या नावांना वन विभागाने स्वीकारले आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात तीन नर वाघ आहेत. २०१८ सालानंतर २०२३ साली १७ डिसेंबर रोजी पाच वर्षानंतर प्रकल्पात वाघाची नोंद झाली होती. या वाघाची ओळख न पटल्याने त्याचा सांकेतिक क्रमांक एस. टी. आर. टी १ असा देण्यात आला. कोल्हापूरच्या राधानगरी वन्यजीव अभयारण्यामध्ये २३ एप्रिल २०२२ रोजी पहिल्यांदाच टिपलेला आणि १३ एप्रिल २०२४ रोजी त्या ठिकाणीच राहिलेला नर वाघ हा १०० किलोमीटर दूरवर असलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात २८ ऑक्टोबर २०२४ रोजी टिपला -गेला. त्याचा सांकेतिक क्रमांक एस. टी. आर. टी २ असा ठेवण्यात आला आहे. त्यानंतर २०२३ साली कोल्हापूरच्या -कडगाव वनपरिक्षेत्रात टिपलेला नर वाघ २०२५ रोजी सह्याद्री प्रकल्पात आल्यामुळे त्याला एस. टी. आर. टी ३ असा सांकेतिक क्रमांक देण्यात आला आहे. हाच वाघ कोकणातून चिपळूण वनपरिक्षेत्रात देखील जाऊन आला होता.
सध्या एस.टी.आर. टी १ व २ हे दोन वाघ चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये असून एस. टी. आर. टी ३ हा वाघ कोयना वन्यजीव अभयारण्यात आहे. शासकीय कागदपत्रांमध्ये या वाघांची ओळख सांकेतिक क्रमांकानुसार नोंदविण्यात आली आहे. मात्र स्थानिक पातळीवर पर्यटकांमध्ये या वाघांविषयी आकर्षण निर्माण करण्यासाठी त्यांना नाव देण्यात आली आहेत. एस. टी. आर. टी १ या वाघाला सेनापती तर एस. टी. आर. टी २ या वाघाला सुभेदार आणि एस. टी. आर. टी ३ या वाघाला बाजी असे नाव देण्यात आले आहे.
सह्याद्रीच्या खोऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार लढले. त्यामुळे या खोयात नांदणाऱ्या वाघांची नावे स्वराज्यातील सरदारांना असलेल्या पदव्यांच्या नावे देण्यात आली आहेत.
- वाघिणींच्या पुनर्वसनासाठी ऑपरेशन 'तारा'
लवकरच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पहिल्या टप्यात दोन वाघीण हे पेंच व्याघ्र प्रकल्प व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून आणण्यात येणार आहेत. याला ऑपरेशन 'तारा' असे नाव देण्यात आले आहे. ऑपरेशन 'तारा' सारख्या शास्त्रीय मार्गदर्शनाखाली राबविलेल्या उपक्रमांमुळे संवर्धनाला नवी ऊर्जा मिळणार आहे. ऑपरेशन 'तारा' या विशेष उपक्रमांतर्गत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प येथून वाघीण सह्याद्रीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या ऑपरेशनमुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात जैवविविधतेला चालना मिळून वाघांच्या संख्येत शाश्वत वाढ होईल.
- अंधारी प्रकल्पातून वाघीण आणण्याचे नियोजन
सध्या विदर्भातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून वाघीण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित करण्याचे नियोजन सुरू आहे. यातून भविष्यात सह्याद्री प्रकल्प परिसरात स्थावर व्याघ्र व एकूणच व्याघ्र परिसंस्थेचे संवर्धन यशस्वीरित्या होण्यात मदत होईल.
-किरण जगताप उप संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कोयना.
- हा सामाजिक सहभागाचे उदाहरण
वाघांना लोकांनीच नावे देणे हा सामाजिक सहभागाचा एक अनोखा प्रकार आहे. त्यामुळे वाघांबाबत आपुलकी वाढते, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील हा संगम भावी काळात संवर्धन, पर्यटन आणि जनजागृती या सर्वच दृष्टींनी महत्त्वाचा ठरणार आहे.
-रोहन भाटे, मानद वन्यजीव रक्षक