शिरोली, मणतुर्गा, नेरसा पंचायतीचे काम ठप्प
नेटवर्क केबल तुटल्यामुळे गैरसोय
खानापूर : खानापूर-हेम्माडगा रस्त्यावरील मणतुर्गाजवळ भुयारी मार्गाचे काम सुरू असताना जेसीबीने खोदाई करताना जमिनीतील ऑप्टीकल फायबर केबल तुटल्याने गेल्या सहा महिन्यापासून दुर्गंम भागातील शिरोली, नेरसा आणि मणतुर्गा पंचायतीचे ऑनलाईन काम ठप्प झाल्याने या पंचायत क्षेत्रातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. मात्र याबाबत मागणी करूनदेखील केबल जोडण्याचे काम संबंधित कंत्राटदाराने केले नसल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.खानापूर-हेम्माडगा रस्त्यावर मणतुर्गाजवळ असलेल्या रेल्वे मार्गावर असलेल्या फाटकाच्या ठिकाणी भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. भुयारी मार्ग तयार करण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम करण्यात आले आहे. यावेळी ग्राम पंचायतीना पुरवण्यात येणाऱ्या ऑप्टीकल फायबर केबल कनेक्शनची वाहिनी तुटली आहे. त्यामुळे या भागातील नेरसा, शिरोली आणि मणतुर्गा पंचायतीचे नेवटर्क खंडित झाले आहे.
त्यामुळे पंचायतीची ऑनलाईन सेवा पूर्णपणे गेल्या सहा महिन्यापासून ठप्प झाली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना पंचायतीकडून मिळणारी कागदपत्रे मिळत नसल्याने शासकीय पातळीवर योजनांचा लाभ मिळवण्यासाठी कागदपत्रे मिळत नसल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच अनेक शासकीय योजनावर पाणी सोडावे लागत आहे. साधा उताराही मिळत नसल्याने नागरिकाना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. ग्राम पंचायत कर्मचारी, शासनाला माहिती पाठविताना आपल्या मोबाईल नेटवर्कचा वापर करून माहिती पुरवत आहे. मात्र सामान्य जनतेला या ग्राम पंचायतीकडून कोणतीही कागदपत्रे अथवा माहिती मिळत नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे. यासाठी ऑप्टीकल फायबर केबलच्या कंत्राटदाराने तातडीने दुरुस्ती करून नेटवर्क कनेक्शन सुरळीत करण्यात यावे, अशी मागणी जनतेतून होत आहे.