मार्कंडेयनगर येथील ‘त्या’ गटारीची स्वच्छता
बेळगाव : मार्कंडेयनगर पहिला क्रॉस व एपीएमसी क्वॉर्टर्समधील ड्रेनेजचे पाणी वारंवार बाहेर पडत होते. यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली होती. मार्कंडेयनगरमध्ये राहणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत होता. त्याची दखल माजी उपमहापौर रेश्मा प्रवीण पाटील यांनी घेतली. तातडीने जेसीबीच्या साहाय्याने गटारी स्वच्छ करून या पाण्याला मार्ग मोकळा करून दिला आहे. एपीएमसीला याबाबत अनेकवेळा कळवण्यात आले. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. जुन्या इमारतीचे व ड्रेनेजचे पाणी मार्कंडेयनगर येथील पहिल्या क्रॉसमध्ये जात होते. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली होती. डासांचा प्रादुर्भावही वाढला होता. सध्या साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे रेश्मा पाटील यांनी तातडीने या परिसराची स्वच्छता केली आहे. जुन्या एपीएमसी क्वॉर्टर्समधील कुटुंबांना नवीन क्वॉर्टर्स बांधून घेऊन सदर समस्या सोडविण्याची सूचनादेखील यावेळी करण्यात आली.