अष्टगंधा सोसायटीत सात कोटींचा गंडा?
ठेविदारांनी सर्व यंत्रणांचे उंबरठे झिजवले : कोर्टाच्या आदेशानंतरही सुटत नाही गुंता
पणजी : अस्नोडा येथील अष्टगंधा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीमध्ये कोट्यावधी ऊपयांच्या ठेवी अडकून पडल्या आहेत. सोसायटी गंडा घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचे लक्षात येताच ठेवीदारांनी आर्थिक गुन्हा विरोधी विभाग, पोलीस महासंचालक यांच्याकडे तक्रारी केल्या. मुख्यमंत्री तसेच सहकारमंत्र्यांकडेही पोहोचविले. न्यायालयाचीही दारे ठोठावली, मात्र काहीच हालचाली होत नसल्याचे दिसून येत आहे. सरकारी यंत्रणा या सोसायटीच्या संचालकांना, कर्मचाऱ्यांना का पाठिशी घालण्याचा प्रयत्न करत आहे, असा सवाल ठेविदारांकडून उपस्थित केला जात आहे. ठेवीदारांनी कष्ट करून कमाविलेले पैसे असेच वाया जाणार की काय असा प्रश्न निर्माण झाला असून ठेवीदारांना आता वाली कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
संचालक झाले गायब?
अष्टगंधा सोसायटीत 100 हून अधिक ठेविदारांनी 7 कोटीहून अधिक रक्कम कायम ठेवी म्हणून ठेवली होती. कालांतराने ठेविंची मुदत संपल्यानंतर ठेवीदार पैसे परत आणण्यासाठी गेले असता पैसे देण्यास सोसायटीकडून टाळाटाळ होत असल्याचे दिसून आले. संचालकही कुठेच कुणाला सापडत नाहीत. संचालक कुठे गायब झाले हे ठेविदारांना अजूनपर्यंत कळू शकलेले नाही.
ठेविदारांची न्यायालयात धाव
मुदत संपून कित्येक दिवस झाले तरी पैसे मिळत नसल्योन अखेर ठेवदारांनी जानेवारी 2023 मध्ये कायदेशीर कारवाई करणे सुऊ केले. निबंधकासह मुख्यमंत्री, सहकारमंत्री यांची भेट घेऊन त्यांच्यापर्यंत प्रकरण पोचविले मात्र काहीच होत नसल्याने अखेर 31 जुलै 2023 रोजी न्यायालयाची दारे ठोठावली.
संचालक मंडळ बरखास्त
न्यायालयाने संचालक मंडळ रवींद्र आर. नाईक (चेअरमन) दिगंबर पी. परब (उप चेअरमन) मोहनदास जी. एस. परब, प्रकाश एल. नाईक, प्रकाश व्ही. नाईक, प्रकाश ए. नाईक कृष्णा बी. हळर्णकर, श्रध्दा आर. नाईक, चंद्रशेखर के. बर्वे (सर्वजण संचालक) बरखास्त करून अष्टगंधा सोसायटीवर प्रशासकाची नेमणूक करा, असा आदेश सहकार निबंधकाना जारी केला. तीन महिन्यांच्या आत आदेशाचे पालन व्हायला पाहिजे, असेही त्यात म्हटले होते.
सहकार खाते अष्टगंधच्या संचालकांना पाठिशी घालते काय?
सहकार निबंधकाने प्रशासकाची नियुक्ती केली, मात्र न्यायालयाने दिलेली मुदत उलटून गेली तरी प्रशासकाने अद्याप ताबा घेतला नसल्याने कोणतीच हालचाल होत नाही. प्रशासक का ताबा घेत नाही, किंवा तो ताबा घेत नाही, म्हणून त्याच्यावर कारवाई का केली जात नाही? दुसरा प्रशासक का नेमला जात नाही? असे प्रश्न उपस्थित होत असून सहकार खाते अष्टगंधाच्या संचालकमंडळाला अभय देऊ पाहत आहे काय? असा मोठा सवाल निर्माण झाला आहे. सोसायटीच्या सगळ्या शाखा बंद असताना संचालक मंडळातील एखादा कुणीतरी कार्यालय उघडून आत नक्की कोणता घोळ करीत असतो, त्याचा पत्ता लागत नाही. त्यामुळे ठविदारांच्या मनात आणखी भिती निर्माण झाली आहे. सरकारने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष घालून गोरगरीब आणि कष्टाळू लोकांचे पैसे त्यांना परत मिळवून द्यावे, अशी मागणी केली जात आहे.