खानापूर तालुक्यात शाळा प्रारंभोत्सव उत्साहात
विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत : पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गोड जेवण
खानापूर : उन्हाळी सुटीनंतर नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली असून शुक्रवारी तालुक्यातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरू झाल्या असून शिक्षण खात्याच्या निर्देशानुसार शाळा प्रारंभोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे प्रवेशद्वार आणि शाळेतील अंगणात तोरण, पताका बांधून रांगोळी काढून शाळा सजवण्यात आल्या होत्या. सकाळी शाळेच्या सुरुवातीला शिक्षकांनी आणि एसडीएमसी कमिटीने विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देवून शाळेत प्रवेश दिला. त्यानंतर प्रार्थना होऊन शाळेच्या कामकाजाला सुरुवात झाली. उन्हाळी सुटीनंतर शैक्षणिक वर्षाला शुक्रवार 31 मे पासून सुरुवात झाली आहे. दि. 29 आणि दि. 30 रोजी शाळा स्वच्छता अभियान राबवून शाळा स्वच्छ करण्यात आल्या. दि. 31 रोजी सकाळी शाळेच्या वेळेत तालुक्यातील सर्व शाळांत तोरण-पताका बांधून शाळेचा प्रारंभोत्सव करण्यात आला. यावेळी तालुक्यातील सर्वच शाळांत विविध उपक्रम राबवून प्रारंभोत्सव करण्यात आला. काही शाळांतून पालक, एसडीएमसी कमिटीने प्रभातफेरी काढून मातृभाषेच्या शिक्षणाबद्दल जागृती केली. तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करून विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला. तर सर्व शाळांमधून विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. पहिल्याच दिवशी गोड जेवण देण्यात आले. तसेच शालेय पाठ्यापुस्तकांचे वितरण करण्यात आले आहे.
सरकारच्या शैक्षणिक सुविधांबद्दल पालकांना माहिती
यावेळी शिक्षकांनी पालकांसह एसडीएमसी सदस्यांना सरकारी शाळेतून पुरविण्यात येणाऱ्या सुविधांबाबत माहिती दिली. यात पोषक माध्यान्ह आहार, मोफत शिक्षण, गणवेष, बूट व सॉक्स तसेच शिष्यवृत्ती देण्यात येते. तसेच आरोग्याचीही काळजी घेण्यात येते. वेळोवेळी पोषक तत्त्वांसाठी औषधी खुराक देण्यात येतो. तसेच शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी शिक्षकांनी आपल्या परीने प्रयत्न केले असून शाळांचे स्वरुपही बदलण्यात आले आहे.
रचनावादाच्या शिक्षण प्रणालीनुसार शिक्षण देण्यात येते. यासाठी भरमसाठ फी आकारणाऱ्या शाळांपेक्षा सरकारी शाळेत पालकांनी आपल्या मुलांना शिक्षणासाठी प्रवेश द्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.
दोन दिवसांनतर शाळा पूर्ण क्षमेतेने गजबजणार
येत्या दोन दिवसानंतर सर्व शाळा पूर्ण क्षमतेने सुरू होणार असून विद्यार्थीही हजेरी लावणार आहेत. सोमवारपासून शाळा पूर्णपणे गजबजून जाणार आहे. शहरातील बुकस्टॉलमध्ये शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी पालकांची गर्दी होताना दिसत आहे. नवनवीन स्कूल बॅग तसेच वह्या, पेन, कंपास पालक खरेदी करताना दिसत आहेत. पहिल्या दिवशीपासूनच पाठ्यापुस्तकांचे वितरण करण्यात येत असल्याचे शिक्षण खात्याकडून सांगण्यात आले आहे.