केंद्रासह राज्याच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन, सांखळीत विकसित भारत यात्रेचा शुभारंभ
सांखळी : केंद्रातील योजनांबरोबरच राज्यातील योजना गोव्यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम आज राज्यातील स्वयंपूर्ण मित्र करीत आहे. त्यामुळे आज राज्यातील लोक स्वयंपूर्णतेकडे वळत आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांखळी येथे विकसित भारत यात्रेच्या शुभारंभप्रसंगी केले. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष रश्मी देसाई, केंद्र सरकारचे अतिरिक्त आयुक्त पवन कुमार, उपनगराध्यक्ष आनंद काणेकर, नगरसेवक दयानंद बोर्येकर, यशवंत माडकर, ब्रह्मानंद देसाई, रियाझ खान, विनंती पार्सेकर, सिध्दी प्रभू, निकीता नाईक, दिपा जल्मी, अंजना कामत मुख्याधिकारी कबीर शिरगावकर, आरोग्याधिकारी डॉ. उत्तम देसाई, अतुल पै बीर व इतरांची उपस्थिती होती.केंद्रातील भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने सुरू केलेल्या महिलासाठी तसेच युवकांसाठी केलल्या विविध योजनांची माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी दिली. केंद्र सरकारतर्फे राबविण्यात आलेल्या विविध कल्याणकारी व स्वयंपूर्णतेकडे नेणाऱ्या योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी गोवा राज्यात होत आहे. असल्याचे यावेळी अतिरिक्त कमिशनर पवन कुमार यांनी सांगितले. नगराध्यक्षा रश्मी देसाई यांनी विचार मांडले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते विकसित भारत यात्रेतील रथाचे पूजन करून तसेच समई प्रज्वलित करून या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. महिलांतर्फे स्वागतगीत सादर करण्यात आले. सूत्रसंचालन समृद्धी गणपुले यांनी केले. यावेळी स्वनिधी योजनेतील लाभार्थींना प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली.