मिळालेल्या पदात समाधान मानून निस्वार्थ लोकसेवा!
केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे उद्गार : देशाच्या अनेक समस्या, प्रश्न सोडविणे हाच प्रमुख हेतू
पणजी : समाज, देशाची सेवा करण्यासाठीच आपण राजकारणात आलो. समाजाच्या, देशाच्या अनेक समस्या, प्रश्न सोडविणे हाच प्रमुख हेतू होता. कधीही पक्षाकडे अपेक्षा ठेवली नाही. मिळाले त्यात समाधानी होऊन निस्वार्थी सेवा सुरू ठेवली. त्यामुळे माझ्याकडे कुठले पद नसले तरी जनतेचा विकास केंद्रस्थानी ठेवून ते कार्य सुरूच ठेवणार आहे, असे मत केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले आहे. काल सोमवारी मराठी पत्रकार संघ आणि गोवा श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर जयंत संभाजी, गुऊदास सावळ, वामन प्रभू, राजतिलक नाईक आदी उपस्थित होते.
पक्षाने दिलेली जबाबदारी मोठी
पुढे बोलताना ते म्हणाले की, आपण भाजप पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे.आपल्या ज्येष्ठतेनुसार कॅबिनेट पद मिळावे ही अनेकांची इच्छा होती, परंतु पक्षाने मला आतापर्यंत चार वेळेस मंत्रिपदाची जबाबदारी दिली आहे. आपण ती जबाबदारीने पार देखील पाडली आहे. भाजप पक्षामुळेच गोव्याचे केंद्रीय स्तरावर नेतृत्व करू शकलो.पक्षाने संधी दिली तर माझी स्थानिक राजकारणात येण्याची देखील तयारी आहे. शेवटी हे राजकारण आहे. कधी इकडे तिकडे होऊ शकते. असे देखील नाईक यांनी नमूद केले आहे.
गोव्याला केंद्राचा लाभ मिळवून दिला
गेल्या काही वर्षांत आयुष मंत्रालयामार्फत आम्ही आरोग्य क्षेत्रात भरपूर विकास केला आहे. दिल्ली, गोवा येथे आंतरराष्ट्रीय आयुष इन्स्टिट्यूट स्थापन केली, जगभर योग केंद्रे झाली. गोव्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात आयुर्वेदिक डॉक्टरांना नोकरी मिळाली. गोमंतकीय जनतेचा कल आता आयुर्वेदाकडे वाढला आहे. गोव्याच्या आयुष हॉस्पिटलमध्ये रोज सातशे ते आठशे ऊग्ण येतात ही खूप चांगली गोष्ट आहे. त्याचप्रमाणे लोकांवर वीज दरवाढीचा बोजा पडता कामा नये. भविष्यात लोड शेडींगची परिस्थिती गोव्यावर येणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पर्यावरणाची काळजी घेऊन तमनार प्रकल्प शक्य
वीज क्षेत्रात गोवा परावलंबी आहे. तमनार हा गोव्यासाठी अत्यंत आवश्यक प्रकल्प आहे. राज्याच्या भविष्यातील विजेच्या मागणीचा विचार करता तमनार प्रकल्पाची गरजच आहे. हा प्रकल्प गोव्यात झाला तर उद्योग, कारभाराची भरभराट होईल. पर्यावरणाची काळजी घेऊन हा प्रकल्प राबवता येणे शक्य आहे. एक झाड कापले तर हजार झाडे लावता येणे शक्य आहे. कर्नाटक सरकार सोबतही सामंजस्याने मार्ग काढता येईल.तमनारबाबत लवकरच आम्ही गोवा सरकार सोबत बैठक घेणार आहोत. त्यासाठी संवादातून पुढे जाऊन हा प्रकल्प मार्गी लावणार असल्याची भूमिका असल्याचे ते म्हणाले.
सहाव्यावेळी लोकसभेत जाताना पत्नी नाही ही उणीव...
माझ्या राजकारणाच्या प्रवासात कुटुंबाचा नेहमी पाठिंबा मिळाला. गेल्या 25 वर्षांच्या या प्रवासात 60 टक्के योगदान हे माझ्या पत्नीचे होते. तिची साथ होती म्हणून यशस्वी झालो. आम्ही राजकारणी भाषणे ठोकतो त्याप्रमाणे घर सांभाळणे, व इतर संसाराच्या गोष्टी नाही करू शकत. त्यामुळे सहाव्यावेळी लोकसभा जिंकलो तरी पत्नीची उणीव नेहमी भासते. जे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही, असेही श्रीपादभाऊ म्हणाले.