चल सर्जा, चल राजा....., कदमांच्या बैलजोडीला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मान!
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळा आषाढीवारी रथासाठी सारथी होण्याचा मान मिळाला
वाई : वाई तालुक्यातील बावधन या गावात खिल्लार बैलांचे मोठ्या प्रमाणावर संगोपन केले जाते. याच गावातील प्रगतशील शेतकरी गणपत सखाराम कदम यांनी घरी सांभाळलेली प्रधान व राजा या बैलजोडीला यंदाच्या संत शिरोमणी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळा आषाढीवारी रथासाठी सारथी होण्याचा मान मिळाला आहे. त्यानिमित्ताने बावधन गावातून वाजत गाजत मिरवणूक काढली. ग्रामस्थ, बैलप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
विवेक ज्ञानेश्वर घुंडरे-पाटील यांनी कदम यांच्याकडून प्रधान व राजा ही बैलजोडी खरेदी केली आहे. याच बैलजोड़ीला यंदाच्या आषाढीवारीच्या पालखी सोहळा रथाचा मान मिळाला आहे. (दि. १९) जूनपासून संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याचे प्रस्थान होईल. या प्रस्थानात आळंदी ते पंढरपूर पालखी मार्ग आहे. आळंदी, पुणे, सासवड, जेजुरी, वाल्हे, लोणंद, तरडगाव, फलटण, बरड, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भेंडी, शेगांव, वारी व पंढरपूर असा आषाढी वारीचा पालखी सोहळा असणार आहे.
पालखी रथाला प्रधान व राजा ही बैलजोडी रथ ओढण्यासाठी बांधली जाईल. हा पालखी सोहळ्याला आनंदवारी म्हणून भक्तगण वारीत सहभागी होतात. या वैष्णवांचा मेळा पाहण्यासाठी भारतासह परदेशातूनही लाखो वारकरी पायीकुंड वारीत सामील होतात. ज्ञानेश्वर माऊली, नाथ तुकारामच्या जयघोषाने पालखी सोहळ अधिक उत्साही व भक्तिमय वातावरणात रंगतो. अशा महान संताच्या आषाढीवारी पालखीसाठी बावधन येथील बैलप्रेमी गणपती सखाराम कदम यांनी आता २१ वर्षांत पदार्पण केले आहे. गणपत कदम यांना आयुष्यात शेत व नामांकित बैल जोपासण्याचा छंद आहे. तो त्यांनी आजतागायत चिकाटीने जपला आहे. आज पालखी सोहळ्यासाठी बैलजोडीची निवड झाल्याने त्यांनी आनंदाचा क्षण उजाडल्याची प्रतिक्रिया दिली आहे.