संजय निषाद यांचा सूर नरमला,योगी आदित्यनाथांची घेतली भेट
वृत्तसंस्था /लखनौ
उत्तरप्रदेशात भाजपचा घटक पक्ष असलेल्या निषाद पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री संजय निषाद हे स्वत:च्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. अधिकाऱ्यांवर त्यांनी मनमानी करण्याचा आरोप केला आहे. याचदरम्यान पोटनिवडणुकीवरून त्यांचा सूर नरमला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे आमचे पालक असल्याचे निषाद यांनी म्हटले आहे. अधिकाऱ्यांच्या अरेरावीप्रकरणी मुख्यमंत्र्यांसमोर म्हणणे मांडणार आहे. मुख्यमंत्री याप्रकरणी कारवाई करतील अशी अपेक्षा आहे. अधिकाऱ्यांशी चर्चा करत त्वरित तोडगा काढला जावा असे निषाद यांनी म्हटले आहे.
रालोआने यापूर्वीही पोटनिवडणुकीत विजय मिळविला होता. लोकसभा निवडणुकीत आम्ही अतिउत्साहात होतो. परंतु यावेळी आम्ही पुन्हा एकजूट होत मजबुतीने निवडणूक लढविणार आहोत. या पोटनिवडणुकीत रालोआच जिंकणार असल्याचा दावा निषाद यांनी केला आहे. संजय निषाद यांनी यापूर्वी योगी सरकारच्या बुलडोझर धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. बुलडोझर चालवाल तर मते मिळणार नाहीत असे निषाद यांनी यापूर्वी म्हटले होते. तर दोन दिवसांपूर्वी निषाद यांनी उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांची भेट घेतली होती, यामुळे अनेक प्रकारचे कयास वर्तविले जात होते.