साखरपा बसस्थानक समस्यांच्या गर्तेत!
देवरुख :
संगमेश्वर तालुक्यातील साखरपा बसस्थानक सध्या समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. प्रवाशांच्या बसण्याच्या जागेवर सिमेंट ठेवण्यात आल्याचे चित्र आहे. यामुळे प्रवाशांना ताटकळत उभे रहावे लागत आहे. स्थानकात सोई सुविधांची वाणवा असून बस लावण्याच्या जागेवर खड्डे पडले आहेत. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.
देवरुख आगारातून देवरुखसह साखरपा, संगमेश्वर, माखजन बसस्थानकांचा कारभार हाकला जातो. पावसाळ्यापूर्वी बसस्थानक परिसराचे काँक्रीटीकरण करण्यात आले होते. चार महिन्यातच हे काँक्रीटीकरण उखडून खड्डे पडू लागले आहेत. यावरून हे काम नित्कृष्ट दर्जाचे झाल्याचे स्पष्ट होत आहे. परिसर सुस्थितीत राखणे संबंधित ठेकेदेराचे काम आहे. ठेकेदेराने पुन्हा डागडुजी करून द्यावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. याबाबत आगार प्रशासनाशी संपर्क साधला असता, परिसराची डागडुजी संबंधीत ठेकेदाराने करून देणे अपेक्षीत आहे. याबाबतचा पत्रव्यवहारही देवरुख आगाराकडून वरिष्ठ स्तरावर करण्यात आला आहे.
प्रवाशांना बसण्यासाठी व स्वच्छता गृह उभारणीचे काम सध्या सुरू आहे. ज्याठिकाणी प्रवासी बसतात तेथे नूतन इमारत बांधकामासाठी सिमेंट उतरण्यात आले आहे. यामुळे प्रवशांना ताटकळत उभे रहावे लागत आहे. बसस्थानकात सुरक्षा रक्षक नाही, सीसीटीव्ही यंत्रणा नाही तसेच स्वच्छकही नाही. पाण्याची टाकी साफ होत नाही, पार्किंगची योग्य व्यवस्था नाही, अशा एक ना अनेक समस्या प्रवासी वर्गाला भेडसावत आहेत.
साखरपा बसस्थानकातून कोल्हापूर, बेळगाव, जत, मिरज, विजापूर, अक्कलकोट, धाराशिव, लातून बस मार्गस्थ होतात. बसस्थानकात दोन वाहतूक नियंत्रकांची आवश्यकता असताना एकच कार्यरत आहेत. सकाळी ८ ते सायं. ४ वाजेपर्यंत हे नियंत्रक कार्यरत असतात. बसस्थानकातून रात्री १०.३० वाजता रत्नागिरी-पुणे बस मार्गस्थ होते. ४ वाजल्यानंतर वाहतूक नियंत्रक नसल्याने स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना कोणतीच माहिती उपलब्ध होत नाही. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. या सर्व समस्यांकडे लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, एसटी प्रेमींचेही दुर्लक्ष होत असल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.