महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पश्चिम भागातील रस्ते हरवले खड्ड्यात!

10:44 AM Sep 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वाहतूक धोकादायक : अपघाताच्या घटनांमध्ये वाढ : वाहनधारक-स्थानिकांतून संताप, प्रशासनाचे दुर्लक्ष

Advertisement

वार्ताहर/किणये

Advertisement

तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक संपर्क रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमुळे किरकोळ अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. खड्डेमय रस्त्यांना वाहनधारक अक्षरश: वैतागून गेले आहेत. या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी वाहनधारक व स्थानिक नागरिकांतून होत आहेत. ग्रामीण भागाच्या विकासासाठी प्रशासनामार्फत विविध योजना राबविल्या जातात. अलीकडे तर रस्त्यांसाठी विशेष योजना राबविण्यात येत आहेत. तालुक्यातील काही रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आलेले आहे. मात्र पश्चिम भागातील अनेक रस्ते खड्डेमय बनले आहेत. या रस्त्यातून वाहतूक करणे अवघड बनले आहे. मच्छे ते वाघवडे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. हावळनगर जवळ भले मोठे खड्डे आहेत. तसेच वाघवडे पुलानजीक व गावच्या प्रवेशद्वाराजवळ मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. वाघवडे रस्त्याच्या बाजूला औद्योगिक वसाहती आहेत. तरीही या रस्त्याच्या डांबरीकरणाकडे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येत आहे.

बेळगाव चोर्ला रोड, पिरनवाडी ते किणयेपर्यंतच्या टप्प्यात बऱ्याच ठिकाणी खड्डे आहेत. या रस्त्यावर गोव्याला ये-जा करणाऱ्या वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. या रस्त्यावर अनेक अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. गतवर्षी खड्ड्यांचे पॅचवर्क करण्यात आले. मात्र त्याचे कामकाज योग्य पद्धतीने करण्यात आलेले नाही. अशा तक्रारी वाहनधारकांतून होत आहे. रस्त्याची परिस्थिती पुन्हा जैसे थे अशीच आहे. 2019 साली अतिवृष्टी झाली. यावेळी कर्ले ते बेळवट्टी या संपर्क रस्त्यावर पाणी आले होते. यावेळी रस्त्याचा काही भाग वाहून गेला व 5 ते 6 ठिकाणी मोठमोठे भगदाड पडलेले आहेत. तसेच खड्ड्यामुळे पूर्ण रस्त्याची चाळण बनली आहे. शेतकऱ्यांना शेताकडे जाणे मुश्कील झाले आहे. पश्चिम भागातील या संपर्क रस्त्यावर या परिसरातील स्थानिक वाहनधारकांची वर्दळ मोठी असते. या रस्त्यावरूनच विद्यार्थी वर्ग, शेतकरी, कामगार वर्ग ये-जा करीत असतात. खड्डेमय रस्त्यावरुन वाहतूक करणे आता धोकादायक ठरू लागले आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

बैलगाडी घेऊन जाणेही अवघड

 

बेळवट्टी ते कर्ले या संपर्क रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. गेल्या सात आठ वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे. बऱ्याच ठिकाणी रस्त्याचा काही भाग पूर्णपणे उखडून गेला आहे. तर मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. या रस्त्यावरून सध्या बैलगाडी घेऊन जाणेही अवघड बनले आहे. बेळवट्टी कर्ले भागातील वाहनधारकांसाठी हा महत्त्वाचा संपर्क रस्ता आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या रस्त्याची पाहणी करून रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत.

- कल्लाप्पा सुतार, बेळवट्टी

खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे अपघात

कर्ले-कावळेवाडी रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी खड्डे पडले आहेत. तसेच कावळेवाडी व बिजगर्णी या संपर्क रस्त्यावर खड्डे आहेत. या रस्त्यांची अवस्था पाहता या भागाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. वाहनधारकांची रोज मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे रात्रीच्यावेळी दुचाकीस्वार खड्ड्यामध्ये पडून किरकोळ जखमी झाले आहेत. त्यामुळे रस्त्यांची दुरुस्ती होणे गरजेचे आहे.

- रवळनाथ मोरे, कावळेवाडी

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article