पूर येथे अवैध वाळू वाहतुकीमुळे रस्ता उद्ध्वस्त
गावकऱ्यांचे रस्त्याविना हाल : लोकप्रतिनिधी, तहसीलदार यांना निवेदन देऊनदेखील दुर्लक्ष
खानापूर : खानापूर आणि अळणावर तालुक्याच्या हद्दीच्या मधोमध वसलेल्या पूर गावाचा समावेश खानापूर तालुक्यात असून तालुक्याचे शेवटचे गाव म्हणून ओळख आहे. हे गाव अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. यातच जोरदार सुरू असलेल्या पावसात नाल्यातील अवैध वाळू वाहतुकीमुळे गावातील आणि संपर्क रस्ता तसेच जंगलातून शेताकडे जाणारा रस्ताही उद्ध्वस्त झालेला आहे. या अवैध वाळू वाहतुकीकडे पोलीस आणि वनखात्याचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. ही वाळू वाहतूक बंद करण्यात यावी म्हणून लोकप्रतिनिधी, तहसीलदार यांना निवेदन देऊनदेखील बंद करण्यात आली नसल्याने ग्रामस्थांना गुडघाभर चिखलातून घर गाठावे लागत आहे.
पूर गावाच्या बाजूने वाहणाऱ्या ओढ्यातील अवैध वाळू वाहतूक अनेक वर्षांपासून सुरू आहे. ही वाळू वाहतूक गावच्या मधोमध असलेल्या रस्त्यावरुन करण्यात येते. त्यामुळे पावसाळ्यात या वाळू वाहतुकीमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल झाला असल्याने या रस्त्यावरुन रहिवाशांना चालत जाणेही कठीण झाले आहे. गुडघाभर चिखल झाल्याने या रस्त्यावरुन फक्त वाळूचा ट्रॅक्टर तेवढाच जात आहे. या वाहतुकीमुळे रस्ता पूर्णपणे चिखलमय झाल्याने ग्रामस्थांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे.
ही वाळू वाहतूक जंगलातील असलेल्या रस्त्यावरुन करण्यात येत आहे. वनखाते नागरिकांना शेताकडे जात असताना तसेच अन्य कारणावरुन वेठीस धरते. मात्र दिवसाढवळ्या आणि रात्री बेधडक अवैध वाळू वाहतूक होत असताना वनखाते गप्प का, असा सवालही पूर ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. तसेच वाळू वाहतुकीवर पूर्णपणे निर्बंध असूनही अवैध वाळू वाहतूक होत असताना पोलिसांचा कानाडोळा होत आहे की, वरदहस्त आहे, असा प्रश्न पूर नागरिकांतून उपस्थित होत आहे. या वाळू वाहतुकीबाबत काही दिवसापूर्वी तहसीलदारांनाही निवेदन देण्यात आले आहे आणि आमदार विठ्ठल हलगेकर यांनाही याबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. मात्र ही अवैध वाळू वाहतूक थांबवण्यात आलेली नसल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.