For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऋतुराज, बावणेच्या शतकानंतरही महाराष्ट्राचे लोटांगण

06:37 AM Oct 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
ऋतुराज  बावणेच्या शतकानंतरही महाराष्ट्राचे लोटांगण
Advertisement

 महाराष्ट्राचा दुसरा डाव 388 धावांत आटोपला : मुंबईला विजयासाठी 74 धावांचे सोपे लक्ष

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

बांद्रा-कुर्ला मैदानावर सुरु असलेल्या रणजी चषक स्पर्धेतील सामन्यात महाराष्ट्र दारुण पराभवाच्या उंबरठ्यावर आहे. ऋतुराज गायकवाड, अंकित बावणेच्या शतकानंतरही महाराष्ट्राचा दुसरा डाव 388 धावांवंर संपुष्टात आला व मुंबईला विजयासाठी 74 धावांचे सोपे लक्ष्य मिळाले. विजयी आव्हानाचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवसअखेरीस मुंबईने बिनबाद 13 धावा केल्या आहेत. पृथ्वी शॉ 7 तर आयुष म्हात्रे 6 धावांवर खेळत होते.

Advertisement

महाराष्ट्राचा पहिला डाव अवघ्या 126 धावांत आटोपला. यानंतर मुंबईने धमाकेदार फलंदाजी करत 441 धावा केल्या व पहिल्या डावात 315 धावांची आघाडी घेतली. प्रत्युतरात महाराष्ट्राने दुसऱ्या डावाची सुरुवात दमदार केली. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा महाराष्ट्राने 1 बाद 142 धावा केल्या होत्या. या धावसंख्येवरुन महाराष्ट्राने पुढे खेळायला सुरुवात केली. सचिन धस व ऋतुराज गायकवाड यांनी 222 धावांची भक्कम भागीदारी साकारली. या दोघांनी एकेरी-दुहेरी धावा तसेच काही आक्रमक फटके लगावत संघाच्या धावसंख्येला आकार दिला. शतकाच्या उंबरठ्यावर असताना 98 धावांवर सचिन धस बाद झाला. धस बाद झाल्यानंतर ऋतुराजने मात्र शानदार खेळी साकारत आपले शतक पूर्ण केले. त्याने 171 चेंडूत 16 चौकार व 2 षटकारासह 145 धावांची खेळी साकारली. डावातील 72 व्या षटकात ऋतुराजला शम्स मुलाणीने बाद केले. ऋतुराज बाद झाल्यानंतर अंकित बावणेने 101 धावांचे योगदान दिले. अंकित बाद झाल्यानंतर मात्र महाराष्ट्राचा डाव कोसळला. इतर फलंदाजांनी निराशा केल्याने महाराष्ट्राचा दुसरा डाव 106.3 षटकांत 388 धावांवर संपुष्टात आला. मुंबईकडून मोहित अवस्थी, तनुष कोटिया व शम्स मुलाणी यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले.

मुंबईला 74 धावांचे टार्गेट

महाराष्ट्राला दुसऱ्या डावात गुंडाळल्यानंतर मुंबईला विजयासाठी 74 धावांचे सोपे आव्हान मिळाले. विजयी आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने 1.2 षटकांत बिनबाद 13 धावा केल्या आहेत. आणखी एका दिवसाचा खेळ बाकी असून मुंबईला आता विजयासाठी 61 धावांची गरज आहे. दरम्यान, मुंबईला आपल्या पहिल्या सामन्यात बडोद्याकडून दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. महाराष्ट्राने आपला पहिला सामना अनिर्णीत राखला होता.

संक्षिप्त धावफलक

महाराष्ट्र प.डाव 126 व दुसरा डाव सर्वबाद 388 (सचिन धस 98, ऋतुराज गायकवाड 145, अंकित बावणे 101, मोहित अवस्थी, मुलाणी व कोटियान प्रत्येकी तीन बळी)

मुंबई प.डाव 441 व दुसरा डाव बिनबाद 13 (पृथ्वी शॉ खेळत आहे 7, आयुष म्हात्रे खेळत आहे 6).

Advertisement
Tags :

.