किर्गिस्तानमध्ये उसळली दंगल
दुतावासाकडून भारतीय विद्यार्थ्यांना घरातच राहण्याचा सल्ला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
किर्गिस्तानची राजधानी बिश्केकमध्ये सध्या प्रचंड दंगल उसळली आहे. येथे स्थानिक लोक काही परदेशी लोकांशी भिडल्यानंतर त्याचे ऊपांतर दंगलीत झाले. सध्या परिस्थिती शांत असली तरी तेथील भारतीय आणि पाकिस्तानी लोकांना स्थानिकांकडून टार्गेट केले जात असल्याचे समजते. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारताने तेथे राहणाऱ्या सर्व भारतीय विद्यार्थ्यांना आपल्या घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी भारतीय विद्यार्थ्यांना भारतीय दुतावासाच्या सतत संपर्कात राहण्याचा सल्ला दिला आहे.
मध्य आशियाई देश असलेल्या किर्गिस्तानमधील भारतीय दुतावासाने आपल्या नागरिकांसाठी अलर्ट जारी केला आहे. दुतावास अधिकारी भारतीय विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहेत. सध्या परिस्थिती शांत असली तरी खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय मिशनने शहरात राहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे. किर्गिस्तानमध्ये भारतीय विद्यार्थ्यांची संख्या सुमारे 15,000 आहे. मात्र, यापैकी किती लोक बिश्केकमध्ये राहतात हे स्पष्ट झालेले नाही.
‘आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहोत. सध्या परिस्थिती शांत आहे परंतु विद्यार्थ्यांना सध्या घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि कोणतीही अडचण आल्यास दुतावासाशी संपर्क साधावा. आमचा 0555710041 हा संपर्क क्रमांक 24×7 चालू असल्याचे किर्गिझ प्रजासत्ताकातील भारतीय मिशनने ट्विटरवर एका पोस्टमध्ये म्हटले आहे.