रायफल नेमबाज सिफ्ट कौरकडून ‘डबल’ सुवर्णपदकाची कमाई
प्रतिनिधी/ श्यामकेंट, कझाकस्तान
ऑलिंपियन सिफ्ट कौर समराने मंगळवारी येथे झालेल्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत वैयक्तिक महिला 50 मीटर रायफल 3 पोझिशन गटामध्ये सुवर्णपदक जिंकले आणि देशाला सांघिक विजेतेपदही मिळवून दिले.
विश्वविक्रमधारक समराने अंतिम फेरीत 459.2 गुणांची शानदार कामगिरी करत चीनच्या यांग युजी (458.8) हिला हरवून सुवर्णपदक जिंकले, तर समरा, दिग्गज अंजुम मुदगिल आणि आशी चौक्सी या त्रिकुटाने 1753 गुणांसह अव्वल स्थान पटकावले. हे समराचे आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील चौथे सुवर्णपदक होते आणि या स्पर्धेत ती पूर्णपणे वेगळ्या सुरात दिसली. कारण तिने आठ नेमबाजांच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरताना 589 गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला.
पात्रता फेरीत अव्वल स्थान पटकावणारी आणखी एक भारतीय श्रियांका सदंदी ही ‘रँकिंग पॉइंट्स ओन्ली’साठी (आरपीओ) स्पर्धा करत असल्याने अंतिम फेरीसाठी पात्र ठरली नाही. ‘आरपीओ’ नेमबाज पदकांसाठी स्पर्धा करू शकत नाहीत. समराचे गुण नीलिंग आणि प्रोन पोझिशनमध्ये 151.0, 156.2 असे राहिले. स्टँडिंग-एलिमिनेशन फेरीत तिला मागे टाकणे कुणालाच शक्य झाले नाही आणि तिच्या चिनी प्रतिस्पर्ध्याने उशिरा केलेल्या प्रतिकारानंतरही शेवटपर्यंत तिने आघाडी कायम राखली. चिनी नेमबाज भारतीय शूटरपेक्षा फक्त 0.4 गुणांनी मागे राहिली.
जपानची नोबाता मिसाकी (448.2) हिने कांस्यपदक जिंकले. चोक्सी, जी पात्रात फेरीत चौथ्या स्थानावर राहून अंतिम फेरीत पोहोचली होती, ती 402.8 गुणांसह सातव्या स्थानावर राहिली. वरिष्ठ व्यावसायिक नेमबाज आणि दोन वेळा ऑलिंपिकमध्ये सहभागी झालेली अंजुम 41 नेमबाजांच्या उच्च दर्जाच्या क्षेत्रात 22 व्या स्थानावर राहिली. समराने सांघिक स्पर्धेत आघाडीवर राहून नेतृत्व केले आणि अंजुम आणि आशीसह भारताला सुवर्णपदकापर्यंत पोहोचवले. समराने उत्कृष्ट कामगिरी करत 589, आशीने 586 आणि अंजुमने 578 गुण मिळवले. या तिघींनी जपानला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले. जपान (एकूण 1750 गुण) आणि दक्षिण कोरियाला (1745) त्यांनी मागे टाकले. सोमवारी राष्ट्रीय खेळांतील विजेती नीरू धांडाने महिला ट्रॅपमधील सुवर्णपदक जिंकण्याच्या मार्गावर खेळातील तिच्या सर्वोत्तम दिवसांपैकी एक अनुभवला होता.